मुंबई : प्रतिनिधी
आंतरराष्ट्रीयस्तराचा विचार केला तर भारतात दर १० लाख लोकांमागे ५ हजार नागरीक कोरोनाग्रस्त आहेत. तर याच दर पाच हजारजणा मागे ८३ जणांचा मृत्यू होत असून ही संख्या तशी कमी आहे. कारण आपण खबरदारी म्हणून खुप काळजी घेत आहोत. मात्र आता सणासुदीचे दिवस असल्याने बाजारात आणि इतर ठिकाणी गर्दीचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे अनेक जणांकडून निष्काळजीपणा दाखविण्यात येत आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र नागरिकांनी असाच निष्काळजीपणा दाखविला तर अमेरिका, इटली, स्पेन, इस्त्रायल सारखी परिस्थिती भारतात निर्माण होवू शकते असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील जनतेला.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्याच्यादृष्टीने लोकांमध्ये जागृती आणण्याच्या उद्देशाने ते आज संध्याकाळी देशातील जनतेशी विशेष संवाद साधत होते. त्यावेळी ते बोलत होते.
कोरोनापासून संपूर्ण मानव जातीला वाचविण्यासाठी जगातील सर्वच देश औषध शोधण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यात भारत ही मागे नाही. देशातही यावर औषध संशोधनाचे काम सुरु असून शास्त्रज्ञ त्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहेत. त्या औषध संशोधनाचा आढावा घेतला असता आशादायक स्थिती आहे. त्याचबरोबर औषध आल्यानंतर देशातील प्रत्येक नागरिकांपर्यत हे औषध कसे पोहोचेल यावर कामही सुरु आहे. त्यामुळे नागरिकांना या विषाणूवर औषध येईपर्यत मास्क वापरणे, तीन फुटाचे अंतर ठेवणे, हात स्वच्छ धुणे आदी गोष्टींमध्ये निष्काळजीपणा करू नये असे आवाहन त्यांनी केले.
लवकरच देशातील टेस्टींगची संख्या १० कोटींच्या पार होणार आहे. आजस्थितीला देशात कोरोना टेस्टींगचे २ हजार लॅब, १२ हजार विलगीकरण सेंटर आणि ६८ लाख नागरिक बरे झाल्याचे त्यांनी सांगितले.
अमेरिकेत कोरोनाचे रूग्ण मधल्या काळात कमी होत होते. मात्र निष्काळजीपणामुळे आता तेथे अचानक कोरोनाबाधितांच्या संख्येत प्रचंड वाढ होत असून तेथील आकडेवारी चिंताजनक आहे. यावर औषध येत नाही तोपर्यत आपणाला ही लढाई अर्धवट अवस्थेत सोडता येत नसल्याचे सांगत वागण्यात निष्काळजीपणा करू नका अशी हात जोडून जनतेला त्यांनी विनंती केली.