मुंबई : प्रतिनिधी
सध्या कोरोनाच्या दुसरी लाटेचा सामना करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार आणि प्रशासन अतिशय चांगल्या पध्दतीने सामना करत असल्याच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेचे उदाहरण देशासमोर ठेवले. त्याच आधारे राज्यातही कोरोनाचा सामना सक्षमपणे करण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना फोन करत महाराष्ट्राचे कौतुक केल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने आज एका प्रसिध्दी पत्रकान्वये दिली.
कोरोनाविरुद्ध लढाईत महाराष्ट्र करीत असलेल्या प्रयत्नांबद्धल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्रयाकडून दूरध्वनीद्वारे माहिती घेतली तसेच दुसऱ्या लाटेशी मुकाबला करतांना महाराष्ट्र चांगली लढाई लढतो आहे असे सांगितले.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी देखील विशेषत: महाराष्ट्राला ऑक्सिजनच्या बाबतीत अधिक बळ मिळावे अशी विनंती केली व विविध उपाययोजनांची माहिती दिली. तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी कसे नियोजन करीत आहोत त्याविषयीही मुख्यमंत्री बोलले. पंतप्रधान आणि केंद्र सरकार हे कोरोना लढ्यात महाराष्ट्राला प्रथमपासून मार्गदर्शन करीत असून त्याचा चांगला उपयोग राज्य सरकारला होतो आहे, महाराष्ट्राच्या काही सुचना केंद्राने मान्यही केल्या याविषयीही मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांचे आभार मानले.
आता दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाचा सामना करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार करत असलेल्या कामाबद्दल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे फोन करून अभिनंदन केल्याने राज्यातील भाजपा नेत्यांकडून करण्यात येत असलेले कोरोना राजकारण थांबवेल का ? असा प्रश्न आता जनतेतून उपस्थित करण्यात येत आहे.