मुंबई: प्रतिनिधी
देशाचे प्रधानसेवक २०१५ मध्ये माझ्या नशिबाने जर पेट्रोलचे भाव कमी झाले असते तर चांगलं झालं असतं असे सांगत होते. परंतु २०२१ मध्ये पेट्रोलच्या दराने शंभरी गाठली आता कुणाचं नशीब आहे अशी खोचक सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला.
जगात पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर असताना भारतातच दर का वाढवले जात आहेत हे मोदींनी जनतेला सांगितले पाहिजे. मात्र मोदींनी या प्रश्नाचे उत्तर दिले नाही उलट पेट्रोल – डिझेलचे दर वाढवून ठेवले आहेत. याच दरवाढीचा धागा पकडत नवाब मलिक यांनी मोदींना २०१५ मधील त्यांच्या वक्तव्याची आठवण करून देताना आता पेट्रोलने शंभरी गाठली मग हे नशीब कुणाचे असे ट्वीट करत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सवाल केला.
दरम्यान पेट्रोल शंभरी पार केल्यानंतर २०१५ मध्ये बोलणारे मोदी २०२१ मध्ये काहीच बोलत नाही. त्यामुळे शेवटी काय ‘बदनसीब जनता’ असे ट्वीट करत आणि व्हिडीओ शेअर करत नवाब मलिक यांनी त्यांच्यावर निशाणा साधला.
चंद्रकांतदादांना ‘त्या’ स्वप्नात आनंद भेटत असेल तर त्यांनी तो आनंद घ्यावा – मलिक
चंद्रकांतदादा रात्री स्वप्न बघतात आणि सकाळी बोलतात. त्यांना त्या स्वप्नात आनंद भेटत असेल तर त्यांनी तो आनंद घ्यावा असा टोला लगावत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे जनता झोपेत असेल त्यावेळी सरकार बदललेले पाहायला मिळेल असे बोलत आहेत. जनता झोपेत असताना आघाडी सरकार निर्णय घेत नाही तर लोकांच्या समोर निर्णय घेते असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला.
आघाडी सरकार एकजुटीने काम करतेय. ‘ऑपरेशन लोटस’ केले पाहिजे अशी काही लोकांची इच्छा आहे. परंतु ते शक्य होत नाहीय. काहींना सरकार येईल असे स्वप्न पडत आहे. मात्र हे आघाडी सरकार पाच वर्षे पूर्ण करेलच शिवाय मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे २५ वर्ष टिकेल. त्यामुळे २५ वर्ष स्वप्न बघतच रहा असा सल्लाही त्यांनी भाजपला दिला.