नागपूर : प्रतिनिधी
राज्यात मंत्री म्हणून विराजमान झाल्यानंतर ग्रामीण भागातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी जलयुक्त शिवार ही योजना तयार केली. ही योजना देशातील इतर राज्यांनाही चांगलीच आवडली असून राजस्थान, मध्य प्रदेश सारख्या राज्यांनी त्याची अंमलबाजवणीही सुरु केली आहे. त्यामुळे जी योजना मी सुरु केलेली आहे. त्याचे श्रेय मलाच मिळणार असून ती योजना स्वत:ची असल्याचे सांगितल्याने होत नसल्याचे सांगत जलयुक्त शिवार योजनेचे श्रेय स्वत:चे असल्याचे ग्रामविकास आणि महिला व बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले. गेल्या काही महिन्यांपासून राज्य सरकारमधील मंत्र्यांनी घेतलेले काही निर्णय मुख्यमंत्र्यांच्या नावे सर्वत्र प्रसिध्द होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मंत्री पंकजा मुंडे यांच्या वक्तव्याला महत्व प्राप्त झाले आहे.
नागपूरातील पत्रकारांच्या सुयोग या निवासस्थानी औपचारीक गप्पा मारताना वरील वक्तव्य त्यांनी केले.
स्वर्गीय नेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधानानंतर मला दिल्लीत राज्यमंत्री म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑफर दिली होती. मात्र मला मुंडे यांची विभागलेली आणि विखुरलेली मते एकत्रित आणायची असल्याने मी राज्यात काम करण्याचा निर्णय घेतला. तसेच मला पक्षाच्या कोअर ग्रुपमध्येही काम करायचे होते. त्यामुळे मी राज्याच्या मंत्रिमंडळात परतण्याचा निर्णय घेतल्याचा खुलासाही त्यांनी यावेळी केला.
राज्य सरकारमध्ये दोन महत्वाची खाती माझ्याकडे असली तरी ग्रामविकास विभागापेक्षा महिला व बाल कल्याण विभागाचे काम आव्हानात्मक असल्याचे सांगत या विभागाचे काम करायला आवडते. कारण या विभागाची केलेली कामे दिसत नसतात. मात्र ती पूर्ण करणे आव्हानात्मक असल्याचे त्यांनी सांगितले.
त्याचबरोबर राज्यात ओबीसी समाजाचे नेतृत्व करण्यासाठी त्याच समाजात जन्माला येणे महत्वाचे नसून कामाने ते स्थान निर्माण करणे गरजेचे आहे. सद्यपरिस्थितीत भाजपमध्ये कृषीमंत्री पांडूरंग फुंडकर, मी स्वत: आणि इतरही अनेकजण ओबीसी समाजाचे नेतृत्व करत असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.