मुंबई : प्रतिनिधी
खर्डा (जि. अहमदनगर) येथील नितीन आगे या युवकाच्या हत्येप्रकरणी १३ साक्षीदार फितूर झाल्याने या प्रकरणातील ९ आरोपी निर्दोष सुटले. याबाबत राज्य सरकार अतिशय गंभीर असून फितूर साक्षीदारांवर कारवाई होण्यासाठी अहमदनगर सत्र न्यायालयात दाद मागणार आहे. तसेच या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री कार्यालयाकडून प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये दिली.
अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील बलात्कार प्रकरणात आरोपींना फाशीची शिक्षा झाली. मात्र याच जिल्ह्यातील खर्डा या कर्जत तालुक्यातील गावात नितीन आगे या १७ वर्षीय दलित युवकाची हत्या खुले आम करण्यात आली. परंतु या प्रकरणातील ९ संशयितांची अहमदनगर न्यायालयाने नुकतीच निर्दोष मुक्तता केली. यातील २६ पैकी १३ साक्षीदार फितूर झाल्याने सदर आरोपी सबळ पुराव्याअभावी निर्दोष सुटले. मात्र याबाबत सामाजिकस्तरातूनच प्रश्न उपस्थित होवू लागल्याने आणि विविध दलित संघटना पुढे येवू लागल्याने राज्य सरकारवर दबाव वाढत होता. त्यातच राज्य सरकारवर या निकालाचे पडसाद उमटू लागण्याची चिन्हे दिसताच भाजपकडून दलित खासदार अमर साबळे यांना पुढे करून हा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न झाला.
या पार्श्वभूमीवर नितीन आगे यांचे वडील राजू आगे यांनी दि. ४ डिसेंबर रोजी आझाद मैदानावर आंदोलन करण्यास सुरुवात केल्याने मुख्यमंत्र्यांनी खासदार अमर साबळे यांच्या मध्यस्थीने भेट घेतली. तसेच न्याय देण्याचे आश्वासन राजू आगे यांना देत तेराही फितूर साक्षीदारांच्या विरोधात कायदेशीर कारवाईसाठी राज्य सरकार सत्र न्यायालयात दाद मागणार असून त्याबाबतचा प्रस्तावही विधि व न्याय विभागाकडून सादर करण्यात आल्याचे सांगत सत्र न्यायालयाच्या निर्णयाला राज्य सरकार मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देणार असून त्याबाबतची कार्यवाही देखील सुरु करण्यात आल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाकडून पत्रकान्वये सांगण्यात आले आहे.