मुंबई: प्रतिनिधी
शरद पवारांचा पहिला आग्रह हा नुकसान झालेल्या भागातील पीडितांना मदत देण्याचा असल्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस वेल्फेअर ट्रस्टच्यावतीने निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या कोकणातील १२ महाविद्यालयात १०० संगणक आज वाटप करण्यात आले असून हा टप्पा इथेच संपत नसून पुढील काळात देखील राष्ट्रवादी कॉंग्रेस वेल्फेअर ट्रस्टतर्फे अशी मदत केली जाणार असल्याची ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.
यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हिरवा झेंडा दाखवत रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या ताब्यात संगणकाने भरलेला ट्रक सुपूर्द केला.
राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या माध्यमातून निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या भागात गरजू आणि अत्यंत अडचणीत असलेल्यांना मदत मिळावी म्हणून प्रा. टी.अे.शिवारे सर व संजय शेट्ये यांनी शैक्षणिक विभागात पुढाकार घेतला. यासाठी ट्रस्टच्या माध्यमातून कोकणातील १२ महाविद्यालयात १०० संगणक वाटपाचा उपक्रम आज करण्यात आला. पाच पेक्षा जास्त आणि १० पेक्षा कमी संगणक प्रत्येक महाविद्यालयाला देण्यात येतील असेही त्यांनी सांगितले.
निसर्ग चक्रीवादळाने नुकसान झाल्याने कोकणातील भागात शैक्षणिक क्षेत्रात मदत करण्यासाठी प्रा.टी.अे.शिवारे सर व संजय शेट्ये यांनी मदत मिळण्यासाठी पुढाकार घेतला. यातून मुंबई विद्यापीठाने पहिल्यांदाच ६७ लाख रुपयांचा निधी देऊन मदत केली असल्याचे कोषाध्यक्ष हेमंत टकले यांनी दिली.
राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या माध्यमातून वादळात नुकसान झालेल्या महाविद्यालयाना १०० संगणकाचे वाटप करण्यात येत आहे. तसेच याआधी ट्रस्टने पन्नास लाखाचे पत्रे देण्याचे काम केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी वेल्फेअर ट्रस्टच्या विश्वस्त खासदार सुप्रियाताई सुळे, कोषाध्यक्ष हेमंत टकले, रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे, विल्सन कॉलेजचे प्रा.टी.अे. शिवारे, सहकार भांडारचे चेअरमन संजय शेट्ये, युवक प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख,युवक कार्याध्यक्ष सुरज चव्हाण उपस्थित होते.