मुंबई : प्रतिनिधी
स्वातंत्र्योत्तराच्या काळात हिंदी चित्रपटसृष्टीला वटवृक्ष बहरत असतानाच दिलीपकुमार नावाची रत्नाची खाण मिळाली. बॉलीवूडसह सिनेरसिकांच्या जवळपास ३ पिढ्याहून अधिक जणांना आपल्या अभिनयाची भुरूळ घालणारे आणि अभिनयाचे विद्यापीठ म्हणून ओळखले जाणारे दिलीप कुमार उर्फ मोहम्मद युसुफ खान यांचे आज सकाळी वयाच्या ९८ व्या वर्षी निधन झाले. तर संध्याकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, खा.सुप्रिया सुळे, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिलीप कुमार यांच्या निवासस्थानी जावून त्यांचे अंत्यदर्शन घेवून आदरांजली वाहीली.
दिलीपकुमार यांचा जन्म १९२२ साली पाकिस्तानातील पेशावर येथे झाला. स्वातंत्र्याच्या पूर्वीच त्यांचे कुटुंबिय मुंबईत आले होते. मुंबईत आल्यानंतर त्यांचे वडील-चुलते हे फळांचा व्यापार करत होते. तसेच त्यांचे कुटुंबाकडून चित्रपट, नाटक आदी गोष्टींना विरोध होता. त्याकाळात इतरांप्रमाणेच त्यांनाही हिंदी चित्रपटाचे वेड होते. आई-वडीलांना कळणार नाही यापध्दतीने ते ही चित्रपट पाहण्यासाठी जात. दिलीप कुमार यांना ज्वारभाटा चित्रपटासाठी संधी मिळाल्यानंतर त्यांचे मोहम्मद युसुफ खान चालणारे नव्हते. त्याकाळी फिल्मी नाव ठेवण्याची प्रथाही होती. देविका राणी यांनी त्यांच्यासमोर दिलीपकुमार या नावासह तीन नावांचा पर्याय ठेवला. त्यापैकी त्यांनी दिलीप कुमार हे नाव स्विकारले. ज्वारभाटाचे चित्रीकरण पूर्ण होईपर्यत त्यांच्या घरच्यांना मोहम्मद युसुफ हे चित्रपटात अभिनय करत असल्याचे माहित नव्हते. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्यांचे पोस्टर पाहून एकाने त्यांच्या
त्यांच्या वडीलांना ही गोष्टी सांगितली. त्यानंतर त्यांचे वडील खातरजमा करण्यासाठी तो चित्रपट पाह्यल्यानंतर चित्रपटातील दिलीप कुमार हा आपलाच मुलगा मोहम्मद युसुफ आहे याची खात्री झाल्यानंतर त्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.
ज्वारभाटा नंतर दिलीपकुमार सुरुवातीचे काही चित्रपटांनी तिकिटबारीवर आपटून मार खाल्ला. त्यानंतर पाकिस्तानच्या ख्यातनाम गायिका नूरजहॉं यांच्यासोबतचा जुगून हा त्यांचा चित्रपट प्रदर्शित झाला आणि दिलीप कुमार यांचे खऱ्या अर्थाने अभिनेता म्हणून प्रवास सुरु झाला. जोगन, बबलू, हलचल, दिदार, तराना, दाग, संगदील, शिकस्त, अमर, उडन खटौला, इन्सानियत (या चित्रपटात त्यांच्यासोबत देव आनंद होते), देवदास, नया दौर, यहुदी, मधुमती, पैगाम, आन, कोहिनूर, मुघल-ए-आझम, आझाद, राम और श्याम, गंगा जमुना,लीडर आदी चित्रपट चांगलेच गाजले. नंतर ८० आणि ९० च्या दशकात त्यांचा कर्मा, सौदागर, मशाल, शक्ती यासह काही मोजके चित्रपट त्यांनी केले. या चित्रपटांतील त्यांच्या अभिनयाची तुलना हॉलीवूडचे प्रसिध्द अभिनेते मार्लन ब्रॅण्डो यांच्याशी करण्यात येत होती. त्यांचा शेवटचा चित्रपट हा अभिनेत्री रेखाबरोबरील किला हा चित्रपट होता.
दिलीपकुमार यांच्यामुळे वेगळ्या त्रिकुटाचे सरकार येता येता राहिले
दिलीप कुमार हे जरी चित्रपट अभिनेते आणि फिल्मस्टार म्हणून नावलौकिक मिळालेला असला तरी प्रत्यक्ष राजकारणात नसतानाही त्यांचा अप्रत्यक्ष सहभाग नेहमी असायचा. बाबरी मस्जिदच्या विध्वंसानंतर महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणूका होवू घातल्या होत्या. त्यावेळी भाजपा-शिवसेना ही कट्टर हिंदूत्वाचा पुरस्कार करणारे होते. या संधीचा फायदा उचलण्यासाठी आणि काँग्रेसला धडा शिकविण्यासाठी काँग्रेसपासून वेगळे झालेले राज्यातील एक बडे नेते भाजपा-शिवसेनेच्या मदतीने राज्यात सत्ता स्थापन करण्याच्यादृष्टीने हालचाली सुरु केल्या होत्या. त्यावेळी महाराष्ट्रातील राजकिय आणि सामाजिक वातावरणही चांगल्यापैकी दुषित झालेले होते.
त्यावेळी या अघोषित आघाडीला रोखण्यासाठी काँग्रेसकडून अनेक शक्यतांची तपासणी सुरु झाली. त्यावेळी दिलीप कुमार यांना काँग्रेसच्यावतीने प्रचारासाठी बाहेर काढल्यास फरक पडेल अशी माहिती काँग्रेस श्रेष्ठींना कळविण्यात आली. त्यावेळी काँग्रेस नेते स्व.प्रणव मुखर्जी आणि सुशीलकुमार शिंदे यांना दिलीप कुमार यांचे मन वळविण्यास पाठविण्यात आले. सुरुवातील दिलीपकुमार या गोष्टीसाठी तयार नव्हते. अखेर दिलीप कुमार यांचे मन वळविण्यात हे दोन्ही नेते यशस्वी झाले. त्यावेळी दिलीपकुमार यांनी राज्यातील जवळपास १५ ठिकाणी काँग्रेसच्या प्रचारार्थ सभा घेतल्या. त्यामुळे विधानसभा निवडणूकीत भाजपा-शिवसेनेला जागा कमी मिळाल्या आणि काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळून काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार सत्तेत आले.