उस्मानाबाद-तुळजापूर: प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुसर्या टप्प्यातील परिवार संवाद दौर्याला मराठवाड्यातून आजपासून सुरुवात झाली असून तुळजाभवानी आईचे दर्शन महाद्वारात उभे राहून घेत राष्ट्रवादी परिवार संवाद दौर्याला प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी प्रारंभ केला. परिवार संवाद दौर्याचा पहिला टप्पा विदर्भातून सुरु झाला होता.त्यानंतर कोरोनाचे संकट आल्याने यापुढील दुसरा टप्प्यातील दौरा स्थगित करण्यात आला होता. आता हाच दुसरा टप्पा मराठवाड्यातून पुन्हा सुरू झाला आहे. ११ दिवसात ४६ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी व पदाधिकाऱ्यांशी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे थेट संवाद साधणार आहेत.
राज्यावर आलेले कोरोनाचे संकट दूर कर आणि अडचणीत आलेल्या सर्व घटकांना त्यांच्या जगण्याला उमेद द्यावी आणि राज्याला पुन्हा एकदा सुखसमृद्धी मिळू दे असे साकडे आई तुळजाभवानीकडे जयंत पाटील यांनी यावेळी घातले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, राज्यमंत्री संजय बनसोडे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवती प्रदेशाध्यक्षा सुलक्षणा सलगर, युवक कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, सुरज चव्हाण आदी उपस्थित होते. या दौऱ्याचा कार्यक्रम कोरोना नियमांचे पालन करुन आखण्यात आला आहे. शिवाय याची रुपरेषा पक्षाचे जिल्हाध्यक्ष आणि यंत्रणांना कळवण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस हा जनतेचा पक्ष जास्तीत जास्त कार्यकर्ते जोडा – जयंत पाटील
राष्ट्रवादी काँग्रेस हा जनतेचा पक्ष आहे. त्यामुळे जास्तीत जास्त कार्यकर्ते जोडा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पक्षाचा आढावा घेताना केले. आज त्यांनी तुळजापूर आणि उमरगा विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला.
पक्षसंघटना बळकट हवी. बुथ कमिटी सक्षम केली तर येणार्या जिल्हा परिषद निवडणुकीला सामोरे जायला मिळेल. शिवाय २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते कुठे कमी पडले याची माहिती जाणून घेतानाच आता येणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादीने कशी मात द्यायला हवी याबाबतचा आढावा त्यांनी घेतला.
राष्ट्रवादी परिवार संवाद दौर्याच्या पहिल्या टप्प्यात तुळजापूर आणि उमरगा विधानसभा मतदारसंघाचा आढावा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी घेतला. त्यांनी तालुकाध्यक्ष ते बुथ अध्यक्षांशी संवाद साधत दोन्ही मतदारसंघाची माहिती घेतली. यावेळी कार्यकर्त्यांच्या अडी अडचणीही समजून घेतल्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, राज्यमंत्री संजय बनसोडे, जयसिंगराव गायकवाड, जीवन गोरे, माजी आमदार राहूल मोटे, आमदार विक्रम काळे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, सुरज चव्हाण, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे, जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, महिला निरीक्षक प्रज्ञा खोसरे, युवक जिल्हा अध्यक्ष आदित्य गोरे, महिला जिल्हाध्यक्षा मंजुषा माडजे, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष दुर्गेश सांळूखे आदी उपस्थित होते.