मुंबई: प्रतिनिधी
राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू असताना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी बैठक अर्धवट सोडून थेट ब्रीच कॅण्डीत दाखल झाले. त्यांच्या विविध तपासण्या करण्यात येत असून त्यानंतर जयंत पाटील यांना अॅडमिट करायचे की नाही याचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती जयंत पाटील यांच्या जवळील एका व्यक्तीने दिली.
सांगली जिल्ह्यात आणि सातारा जिल्ह्यात आलेल्या पुरापासून नागरीकांना वाचविण्यासाठी आणि त्यांच्या सोयी सुविधांची पाहणी करण्यासाठी जयंत पाटील हे सातत्याने अक्षरक्ष गावं ना गावं पिंजून काढत फिरत होते. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत पूरग्रस्त कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्याचा दौरा केला. तसेच त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार, स्वत: मंत्री जयंत पाटील, राज्यमंत्री विश्वजीत कदम, मंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासह पाच मंत्री एकाच विमानाने काल दुपारनंतर मुंबईत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी आणि पूरग्रस्त भागाची माहिती देण्यासाठी एकाच विमानाने आले. त्यानंतर आज अचानक ते ब्रीच कॅण्डीत गेल्याने अनेकविध तर्क-वितर्कांना उधाण आले.
दरम्यान, त्यांची प्रकृतीत उत्तम असल्याची माहिती त्यांच्या मंत्री कार्यालयाकडून देण्यात आली. तसेच रूटीन चेकअपसाठी रूग्णालयात गेल्याचे स्पष्ट करण्यात आले.
मंत्री कार्यालयाच्या खुलाशानंतर काही वेळानंतर जयंत पाटील यांनी ट्विटरवरून खुलासा करत आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने माझी प्रकृती अत्यंत उत्तम आहे. काळजी करण्याचे कारण नाही. नियमित तपासणीसाठी मी रुग्णालयात गेलो होतो. डॉक्टरांनी मला विश्रांती घेण्याची सुचना केली आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. मी लवकर पुन्हा आपल्या सेवेत रुजू होईल. धन्यवाद! असा खुलासा केला.
आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने माझी प्रकृती अत्यंत उत्तम आहे. काळजी करण्याचे कारण नाही. नियमित तपासणीसाठी मी रुग्णालयात गेलो होतो. डॉक्टरांनी मला विश्रांती घेण्याची सुचना केली आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. मी लवकर पुन्हा आपल्या सेवेत रुजू होईल. धन्यवाद!
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) July 28, 2021