Breaking News

आमचे नेते घाबरणारे नाही… उलट सरकार अजून भक्कम होतेय राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांनी व्यक्त केला विश्वास

मुंबईः प्रतिनिधी
ईडी, एनआयए आणि एनसीबीसारख्या सर्व यंत्रणांचा वापर महाराष्ट्रातील सरकार व नेत्यांविरुद्ध कटकारस्थान करण्यासाठी केला जातोय. परंतु आमचे नेते घाबरणारे नाही उलट सरकार अजून भक्कम होतेय असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कंपन्यांवर आयकर विभागाने धाडी टाकल्या असून यावर नवाब मलिक यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.
ज्यापध्दतीने अजित दादांच्या कंपन्यांवर धाडी टाकण्यात येत आहेत त्यावरून स्पष्ट होते आहे की, या राज्यात किंवा जिथे जिथे भाजपा विरोधी सरकार निर्माण झाले आहे, त्या सरकारला टार्गेट करून बदनाम केले जात आहे. जी परिस्थिती पश्चिम बंगालमध्ये होती तीच परिस्थिती राज्यात निर्माण करण्याचे काम केंद्र सरकारच्या माध्यमातून होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
काल जाहीर झालेला जिल्हा परिषद पोटनिवडणुकीचा निकाल वेगळा लागला असला तरी ७० टक्के जागा जनतेने महाविकास आघाडीतील पक्षांना दिल्या आहेत. त्यामुळे जितकं आम्हाला केंद्रातील भाजप सरकार टार्गेट करेल बंगालसारखी परिस्थिती या राज्यात निर्माण होईल असा इशाराही त्यांनी दिला.
लखीमपूरमधील घटनेनंतर शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ महाविकास आघाडी सरकारने ११ ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक दिली असून राज्यातील जनता केंद्रातील भाजपच्या जुलमी सरकारच्याविरोधात जोरदार पाठिंबा देईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
एनसीबीने ३ ऑक्टोंबर रोजी मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रुजवर कारवाई करत बॉलीवूड सुपरस्टार शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान, अरबाज मर्चंट यासह एका महिलेला अटक करण्यात आली. मात्र ही कारवाई कायदेशीर नियमाला धरून नसल्याचा गौप्यस्फोट नवाब मलिक यांनी केला होता. तसेच एनसीबीने ही कारवाई केली नव्हती तर भाजपाशी संबधित व्यक्तीने ही कारवाई केल्याचा आरोपही त्यांनी केला.
मलिक यांच्या गौप्यस्फोटानंतर एनसीबीने तात्काळ पत्रकार परिषद घेत क्रुजवर करण्यात आलेली कारवाई ही एनसीबीनेच केली होती असा खुलासा करत या कारवाई दरम्यान मनिष भानुशाली आणि के.पी.गोसावी यांनी मदत केल्याचे स्पष्ट करत मलिक यांनी केलेले इतर आरोप फेटाळून लावले.

Check Also

काँग्रेसच्या सुप्रिया श्रीनाटे यांच्या पोस्टवर भाजपाच्या कंगणा राणौतची सावध भूमिका

काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनाटे यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर कंगना राणौतची आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्यानंतर वाद सुरू …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *