मुंबई: प्रतिनिधी
मागील सहा महिन्यापासून सातत्याने देशभरात पेट्रोल-डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. सद्यपरिस्थितीत देशातील जवळपास १२ राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दराने १०० री ओलांडली असल्याने सर्वसामान्य जनतेला महागाईचा सामना करावा लागत आहे. २०१४ साली देशाच्या पंतप्रधान पदाची धुरा हाती घेतल्यानंतर पेट्रोल-डिझेलच्या दर कमी झाले होते. त्यावेळी गुजरात मध्ये झालेल्या जाहिर सभेत माझ्या नशीबामुळे देशातंर्गत इंधनावरील दरात घट झाल्याचे जाहिर वक्तव्य केले होते. त्या वाक्याचा धागा पकडत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सवाल करत आता इंधनाची दरवाढ कोणामुळे होत आहे, जनतेच्या की तुमच्या नशिबाने असा सवाल केला.
मेरे नशीबसे दाम कम हो रहे है असं बोलणारे मोदीजी आता कुणाच्या नशीबाने भाव वाढत आहेत. तुमच्या नशीबाने की जनतेच्या नशीबाने… कोण बदनशीब आहे देशातील जनता की तुम्ही याचं उत्तर मोदींनी द्यावे अशी मागणीही त्यांनी केली.
आजच्या दिवशी पेट्रोल व डिझेल आणि सीएनजी, एलपीजी यांचे भाव गगनाला भिडले आहेत त्यावर बोलताना मलिक यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला.
देशात पेट्रोल – डिझेलच्या मुद्दयावर भाजपने निवडणूक लढवली. अब की बार मोदी सरकार बोलत सत्तेवर आल्यानंतर काही काळात भाव कमी केले. दिल्ली विधानसभा निवडणुकीत मोदींनी मेरे नशीबसे दाम कम हो रहे है तो विपक्ष को क्यू बुरा लगता है आपको नशीबवाला चाहिए की बदनशीबवाला चाहिए असे बोलून मोदींनी विरोधकांना डिवचले होते.
दरम्यान हाच मुद्दा पकडून नवाब मलिक यांनी मोदींवर हल्लाबोल केला.