मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्रातही तोक्ते वादळ आले मग महाराष्ट्राबाबत पंतप्रधान भेदभाव का करत आहेत असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला.
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी तोक्ते वादळाने नुकसान झालेल्या दीव-दमण आणि गुजरातचा हवाई दौरा केला. महाराष्ट्रात तोक्ते वादळ येऊन नुकसान करुन गेले आहे. मग महाराष्ट्राचा दौरा पंतप्रधान का करत नाहीत. महाराष्ट्राबद्दल असलेल्या या भेदभावाबद्दल त्यांनी ट्वीट करत सवाल उपस्थित केला.
अरबी समुद्रातील तोक्ते वादळाचा फटका महाराष्ट्रालाही बसला. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदूर्ग जिल्ह्यातील कोट्यावधी आंब्याच्या बागा, काजूच्या बागा उध्दवस्त तर अनेक मच्छिमारांच्या बोटींचेही नुकसान झाले असून अनेक नागरीकांचेही नुकसान झाले आहे. या वादळामुळे कोकणवासीयांवर दुसऱ्यांदा निसर्ग कोपाला सामोरे जावे लागल्याने मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले आहे.
दिव-दमण, गुजरात राज्यांनाही अशाच नुकसानीचा सामना करावा लागला. त्यामुळे पंतप्रधानांनी गुजरात, दिव दमण बरोबर महाराष्ट्राचा दौरा केला असता तर पंतप्रधानकडून महाराष्ट्राबरोबर भेदभाव करत असल्याचे चित्र दिसून आले नसते. मात्र आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फक्त गुजरात आणि दिव दमण भागाची आज दुपारच्या सुमारास हवाई पाहणी केल्याने महाराष्ट्राला सापत्नपणाची वागणूक देत असल्याचे स्पष्ट होत आहे.