मुंबई: प्रतिनिधी
आमदारांचे कोरोना रिपोर्ट आल्यावर विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणूकीचा अंतिम निर्णय होईल. परंतु आम्ही विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक बहुमत सिद्ध करताना जी संख्या होती, त्यापेक्षा जास्त मताने जिंकू असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केला.
विधानसभा उपाध्यक्षांना पत्र लिहून सरकारने विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीबाबत सुचवलं आहे. निश्चितरुपाने महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक घेणं आवश्यक आहे. त्याबाबत तिन्ही पक्षात एकमत आहे. दोन दिवसाचं अधिवेशन असलं तरी याच अधिवेशनात कार्यक्रम करता येईल यावर विचारविनिमय सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान राज्यपाल विधानसभा उपाध्यक्षांना अध्यक्ष पदाची निवडणूक लवकर करा असे सूचित करत आहेत. मात्र विधानपरिषदेच्या १२ जागा रिक्त आहेत तोपण विषय प्रलंबित आहे, तो निकाली काढलात तर १२ आमदार महाराष्ट्रातील जनतेच्या विकासासाठीच्या कामाला लागतील असे सांगत आमचा आग्रह वारंवार राहिल्याची आठवणही नवाब मलिक यांनी राज्यपालांना पुन्हा एकदा करुन दिली. विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक घेऊच पण त्याअगोदर १२ आमदार नियुक्तीचे प्रकरण लवकर निकाली काढा अशी विनंतीवजा आग्रह नवाब मलिक यांनी राज्यपालांना केला.
भाजपची लोकं ठरवणार… निर्णय घेणार…लोकांना अटक करणार… दंड ठोठावणार… ही लोकशाही आहे का?
भाजप ठरवणार… भाजप मागणी करणार… भाजपची लोकं निर्णय घेणार… भाजपची लोकं लोकांना अटक करणार… लोकांना दंड ठोठावणार… ही लोकशाही आहे का? असा संतप्त सवाल त्यांनी केला.
आम्ही बोलू तोच कायदा… आम्ही बोलू तेच होणार इतकी लोकशाहीची थट्टा होऊ शकत नाही. भाजपने देशात ज्याप्रकारची परिस्थिती म्हणजे भयाचे वातावरण निर्माण करायचं… लोकांवर राजकीय दबाव आणायचा. परंतु त्यांचं बंगाल मॉडेल फेल ठरले आहे हे लक्षात ठेवावे असे सांगत महाराष्ट्रातही बंगाल मॉडेल करायची भाजपची इच्छा असेल तर करावी. भाजपच्या डावपेचाला महाविकास आघाडीतील एकही पक्ष घाबरत नाही हे लक्षात ठेवावे असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.