मुंबई: प्रतिनिधी
केंद्राला १५० रुपये, राज्याला आधी ४०० आणि नंतर ३०० रुपये तर खाजगी हॉस्पिटलसाठी ७०० रूपये लस देण्याचे पुनावाला यांनी जाहीर केले. हा सगळा संशय निर्माण करणारा विषय असून याला पुनावाला स्वतः जबाबदार आहेत त्यांना कोण बदनाम करत नसल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केले.
माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना नवाब मलिक यांनी वरील माहिती दिली.
सुरुवातीला राज्याला ४०० रुपयांनी लस देणार असल्याचे सांगितले, मग त्यांनी ३०० रुपये भाव स्वतः जाहीर केला. हे सगळं संशय निर्माण करणारे विषय आहेत. ज्यापध्दतीने ४०० रुपये किंमत ठरवतात आणि नंतर ट्वीट करुन ३०० रुपयाला द्यायला तयार आहे असे सांगितले. हा जो संशय निर्माण होतोय त्यामुळे देशातील जनतेच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले झाल्याचे त्यांनी सांगितले.
नुसती माझी पब्लिसिटी होईल यासाठीच मी काम करणार ही कार्यपध्दत योग्य नाही -मलिक
आपल्या देशाला अडचणीत आणून इतर देशांना लस देणे योग्य नव्हते. याचा अर्थ स्पष्ट आहे की, कुठलंही नियोजन नाही. नुसती माझी पब्लिसिटी होईल यासाठीच मी काम करणार ही कार्यपध्दत योग्य नसल्याची जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली.
निवडणूकांसाठी व भावनेच्या राजकारणासाठी ही सगळी परिस्थिती देशात निर्माण करण्यात आली आहे. लसीचे उत्पादन आपल्याकडे कमी असताना इतर देशांना लस देण्यात आली असा आरोपही त्यांनी केला.
आता हे सगळं सोडून देशामध्ये जे कोरोनाचे संकट आहे. या आरोग्य आणीबाणीत केंद्राने सर्वपक्षीय बैठक बोलवावी त्यांची एकजूट करावी आणि त्याच्यातून निश्चित धोरण तयार करून कोरोनावर मात देता येईल असा कार्यक्रम तयार करावा अशी सूचनाही नवाब मलिक यांनी केली आहे.