सांगली : प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या राजकारणात जयंत पाटील यांचा आपल्या आगळ्यावेगळ्या कार्यपद्धतीसाठी नावलौकीक आहे. असाच एक नावलौकिक मिळवलेला त्यांचा आगळावेगळा ‘इस्लामपूर पॅटर्न’ आता नव्याने समोर आला आहे. लोकसहभागाचा दृष्टिकोन राखून इस्लामपूर मतदारसंघातील बुथ कमिट्यांच्या बैठकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या कार्यालयातून घरोघरी आमंत्रण पत्र पाठवले जात आहे.
आपला बुथ मजबूत असेल तर कोणतीही निवडणूक लागली तरी लोकप्रतिनिधी निश्चिंत राहतात. जयंत पाटील यांचीही आपल्या मतदारसंघातील प्रत्येक बुथवर अशीच पकड आहे. नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी मंत्री जयंत पाटील आठवड्यातील दोन दिवस हमखास देतात. बुथ कमिटीच्या बैठकीत नागरिकांचा समावेश व्हावा, प्रत्येक नागरिकाचे प्रश्न सुटावेत म्हणून खुद्द जयंत पाटीलच नागरिकांना पत्र लिहून बुथ कमिटी बैठकांना उपस्थित राहण्याचे आमंत्रण देतात.
लोकांशी सतत संपर्कात राहणे… त्यांचे प्रश्न समजून घेणे… त्या समस्यांची सोडवणूक करणे तसेच त्यांच्या अडीअडचणी धावून जाणे हेच तर जयंत पाटील यांच्या विजयाचे रहस्य.. ! त्यामुळेच यंदा सातव्यांदा जयंत पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून इस्लामपूरच्या जनतेने त्यांच्या हाती इस्लामपूरची धुरा दिली आहे.