मुंबई: प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसची कोणतीही जबाबदारी राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्याकडे देण्यात आलेली नाही अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी शरद पवार- प्रशांत किशोर यांच्या शुक्रवारी झालेल्या भेटीबाबत अधिकृत भूमिका मांडली.
प्रशांत किशोर हे राजकीय रणनीतीकार आहेत. त्यांचा वेगळा अनुभव आहे. तो अनुभव आणि देशात राजकीय परिस्थिती काय आहे याची माहिती प्रशांत किशोर यांनी शरद पवारांना दिली. देशातील सर्व विरोधी पक्षांची एकजूट करण्याची इच्छा पवारसाहेबांची आहे आणि ती त्यांनी बोलून दाखवली आहे. पश्चिम बंगालच्या निवडणुकीपूर्वी शरद पवार बंगालमध्ये जाणार होते. मात्र तब्येतीमुळे त्यांना जाता आले नाही. परंतु देशातील सर्व विरोधी पक्षांची एकजूट करणार आहेत. भाजपच्या विरोधात एक सशक्त मोर्चा काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्नशील असून येणाऱ्या काळात हा प्रयत्न केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
उत्तरप्रदेशमध्ये परिवर्तन होणार – मलिक
केंद्राच्या किंवा उत्तर प्रदेशमधील मंत्रिमंडळात बदल होवो अथवा ना होवो उत्तर प्रदेशमध्ये परिवर्तन होणार हे जनतेने मनात पक्के केले आहे. केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळात फेरबदल करण्याच्या बातम्यांनी जोर धरला आहे. फेरबदल करायचा की नाही हा अधिकार पंतप्रधानांचा आहे. शिवाय उत्तरप्रदेशच्या मंत्रिमंडळात बदल योगीजी करोत अथवा ना करोत तोही त्यांचा अधिकार आहे. मात्र यावेळी जनतेने बदल करण्याचा विचार पक्का केल्याचे त्यांनी सांगितले.