मुंबई: प्रतिनिधी
न्यायालयसुध्दा चंद्रकांत पाटील यांच्या बोलण्यानुसार काम करत असेल तर लोकशाही कुठेतरी संपली असं जाहीर करा. नाहीतर चंद्रकांतदादा पाटील यांनी न्यायालयाची माफी मागावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते मंत्री छगन भुजबळ यांना जामीनावर सुटला आहात अशी धमकी दिली होती. यावर नवाब मलिक यांनी चंद्रकांत पाटील यांचा समाचार घेतला आहे.
दरम्यान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील अशा पध्दतीने बोलत असतील तर न्यायालयाने सुमोटोअंतर्गत कारवाई करावी अशी मागणी करत आजपर्यंत भाजपकडून एजन्सीचा दुरुपयोग करण्यात येत आहे हे सिद्ध झाले आहे. आता न्यायालयसुध्दा त्यांच्या बोलण्यावर काम करतेय का? असा सवालही त्यांनी केला.
मंत्री छगन भुजबळ यांचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. परंतु भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या बोलण्याचा अर्थ काय आहे अशी विचारणाही त्यांनी केली.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूकीचा निकाल जाहिर होत असताना मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना झाशीची राणींची उपमा देत त्यांनी दिलेल्या लढतीबद्दल कौतुक केले. यावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया विचारली असता छगन भुजबळ यांना धमकीच देत भुजबळ तुम्ही जामीनावर आहात. जे काही बोलायचं आहे ते इथल्या गोष्टींवर बोला. उगीचच पश्चिम बंगालवर वगैरे बोलू नका अन्यथा महागात पडेल असा धमकीवजा इशाराच पाटील यांनी दिला. त्यामुळे राज्याच्या राजकारणात भाजपाचा मुजोरपणा दिसून येवू लागला असून आता विरोधात बोलणाऱ्यांना धमक्या देण्याचे प्रकार सुरु झाल्याचे दिसून येत आहे.
यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कुठेतरी लोकशाही संपली असे जाहिर करा अन्यथा न्यायालयाची माफी मागा अशी मागणी केली.