मुंबई : प्रतिनिधी
मोदी सरकार हाय हाय… योगी सरकारचा धिक्कार असो… भाजप सरकारचं करायचं काय… खाली डोकं वर पाय… लखीमपूर के दरिंदो को फाशी दो… फाशी दो… किसानो के सम्मान मे राष्ट्रवादी मैदानमे… अशा जोरदार घोषणाबाजी देत राष्ट्रवादीने हुतात्मा चौक दणाणून सोडला.
उत्तर प्रदेशमध्ये लखीमपूर खीरी येथे भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या गाडीने शेतकऱ्यांना चिरडून मारले होते. याविरोधात महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी आज ‘महाराष्ट्र बंद’ ची हाक दिली होती.
आज हुतात्मा चौकात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील, खासदार सुप्रियाताई सुळे आणि मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखाली मोदी आणि योगी सरकारचा जोरदार निषेध करण्यात आला.
सकाळी साडेदहा वाजता हुतात्मा चौकात राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाल्यावर मोदी व योगी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. लखीमपूर हिंसाचाराचा निषेध आणि शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादीच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी काळ्या फिती बांधत केंद्र व योगी सरकारचा जोरदार निषेध केला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील, खासदार सुप्रियाताई सुळे, मुंबई अध्यक्ष व अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र वाहून अभिवादन केले. यावेळी मुंबईतील पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मविआच्या ‘महाराष्ट्र बंद’ ला मनसेचा विरोध आहे मग लखीमपूर हत्येला पाठिंबा आहे का -नवाब मलिक
लखीमपूर येथील शेतकरी हत्येला भाजपचा पाठिंबा आहेच शिवाय मनसेचेही शेतकऱ्यांच्या हत्येला समर्थन आहे म्हणजे मविआने पुकारलेल्या ‘महाराष्ट्र बंद’ ला विरोध करुन मनसे शेतकरी हत्येला पाठिंबा देत आहे का ? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी माध्यमांसमोर बोलताना उपस्थित केला.
उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खीरी येथील शेतकऱ्यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी आज ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली. यावेळी हुतात्मा चौकात शेतकर्यांच्या समर्थनार्थ आंदोलन करताना नवाब मलिक यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.
उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खीरी येथे भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री यांच्या मुलाने गाडीखाली शेतकऱ्यांना चिरडून मारले होते. त्यांना अटक करण्यासाठी टाळाटाळ करण्यात येत आहे. केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
‘महाराष्ट्र बंद’ मध्ये कुठे अनुचित प्रकार घडला असेल तर त्याची माहिती घेतली जाईल. या बंदला राज्यातील जनतेने चांगला पाठिंबा दिला आहे शिवाय राज्यातील व्यापारी व कामगार संघटनांनी पाठिंबा दिल्याने सांघिक बंद यशस्वी झाल्याचे नवाब मलिक यांनी सांगतानाच सर्व व्यापारी संघटनांचे आभार मानले.
विनाकारण कोणालाही त्रास होऊ नये अशी भूमिका महाविकास आघाडी सरकारची आहे. हिंसेचे समर्थन होणार नाही. शांततापूर्वक पद्धतीने हे आंदोलन पुढे घेऊन जायचे आहे असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी खासदार सुप्रियाताई सुळे, प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील व पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.