मुंबई: प्रतिनिधी
सात वर्षात नोटाबंदी झाली… जीएसटी लावण्यात आली… कोरोनासारखी महामारी हाताळता आली नाही… लोकांचे हाल झाले… बेरोजगारी वाढली… नोकर्या गेल्या… लोकं जीव गमावत आहेत…तरीही भाजप सरकारची ७ वर्ष साजरी करणार होती अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली.
दरम्यान भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांना उत्सव साजरा करु नका असा आदेश काढावा लागला असल्याचेही ते म्हणाले. २६ मे रोजी केंद्रातील भाजप सरकारला ७ वर्ष पूर्ण होत आहेत. त्यावर नवाब मलिक यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.
या देशात भाजपचे सरकार आहे मात्र ते मोदी सरकार म्हणून ओळखले जाते. या सरकारला सात वर्षे पूर्ण झाल्याबद्दल भाजपचे लोक उत्सव साजरा करणार होते, मात्र राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांनी उत्सव साजरा करु नका असा आदेश काढला आहे ही सत्य परिस्थिती असल्याचे त्यांनी सांगितले.
मोदींचे ‘असे’ इंडियन मॉडेल कोणच स्वीकारणार नाही
नदीमध्ये मृतदेह प्रवाहीत करणे… ऑक्सिजन अभावी लोकं मरत आहेत… औषधांचा तुटवडा आहे… देशात लस उपलब्ध नसताना लस देण्याचा कार्यक्रम जाहीर करणे हे इंडियन मॉडेल कोणच स्वीकारणार नसल्याचे टोलाही त्यांनी लगावला.
इंडियन मॉडेल झालेच पाहिजे परंतु हेच इंडियन मॉडेल असेल तर लोकांना यावर बोट ठेवण्याची संधी भाजप निर्माण करुन देतेय. चांगली कामे करत राहिले पाहिजे. एखादं यश असेल किंवा काम झालं असेल तर निश्चितरुपाने लोकं प्रशंसा करतात पण अपयशी ठरुनही आम्ही चांगलं काम करतोय असं भाजप बोलत राहिला तर लोकं स्वीकारणार नाहीत असा टोलाही त्यांनी लगावला.
त्याचदिवशी परचा आणि मास्क दोन्ही गायब होते याचा अर्थ हा ठरवून झालेला कार्यक्रम होता
मुख्यमंत्र्यांसोबत स्वतःच्या केबिनमध्ये बसून व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे बोलताना मोदीसाहेब नेहमी परचा आणि मास्क वापरत होते. मात्र त्याचदिवशी परचा आणि मास्क दोन्ही गायब होते याचा अर्थ हा ठरवून झालेला कार्यक्रम होता असा आरोपही त्यांनी केला.
याच कार्यक्रमात मोदींनी मास्क का घातला नाही व परचा का घालून आले नाहीत. ते खरंच भावूक झाले की ठरवून झाले यावर जनता प्रश्न करत आहेत. देशात लाखोंच्या संख्येने लोकांनी आपला जीव गमावला.औषधोपचार मिळत नाही. प्रशासन पूर्णपणे ठप्प झाले. केंद्र सरकार व बहुतांश राज्य सरकारांच्या हलगर्जीपणामुळे अनेकांनी जीव गमावला आहे. मोदी सरकारच्या विरोधात जनआक्रोश निर्माण झाला आहे त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाले हे जे चित्र निर्माण करण्यात आले की ते भावूक झाले याबाबत लोकं प्रश्नचिन्ह निर्माण करत असल्याचेही ते म्हणाले.
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी खरंच भावूक झाले की मग ठरवून झाले याचं उत्तर आणि खरं काय आहे हे मोदीच सांगू शकतील असा टोला त्यांनी लगावला आहे.
भाजपचा इतर पक्षाच्या नेत्यांवर आजवर दबाव होता परंतु आता आपल्या नेत्यांवरही दबाव टाकावा लागतोय
भाजपचा इतर पक्षाच्या नेत्यांवर आजवर दबाव होता. परंतु आता भाजपला आपल्या नेत्यांवरही दबाव टाकावा लागतोय अशा शब्दात मलिक यांनी भाजपवर शरसंधान साधले.
भाजप नेते सुब्रमण्यम स्वामीजी यांनी डिलीट केलेलं ट्वीट आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलेले वक्तव्य काही तासातच माघारी घेतल्याची बाब समोर आली. ज्याप्रमाणे गुजरातला १ हजार कोटी दिले तसेच नुकसान झालेल्या राज्यांना विशेषतः महाराष्ट्र आणि इतर राज्यांना आर्थिक मदत देण्याचं ट्विट भाजप नेते सुब्रमण्यम स्वामीजी यांनी केलं. पण काही तासानंतर त्यांनी ते ट्विट डिलीट केलं. याआधी नितीन गडकरी यांनीही याप्रकारे वक्तव्य केल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांना वक्तव्य मागे घेण्यास सांगितले गेले. ट्वीट डिलीट होतेय. नेते बोलल्यानंतर शब्द मागे घेतायत म्हणजे अंतर्गत बोलण्याचा अधिकार नाही हे यातून सिद्ध झाल्याचे त्यांनी सांगितले.