मुंबई: प्रतिनिधी
लोकसभा निवडणूकीच्या काळात काश्मीर येथील पुलवामा येथे लष्करावर झालेल्या हल्ल्याला दोन वर्षे पूर्ण झाले असून या दोन वर्षात सरकारने काय तपास केला ? चौकशीत कोणती माहिती बाहेर आली? असा सवाल करत चौकशीतील माहिती जनतेला द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली.
पुलवामा हल्ल्यात लष्करी जवानांचा बळी गेला. त्यावेळी केद्राने या प्रकरणाचा तपास करणार असल्याची घोषणा केली होती. मात्र दोन वर्षे झाली तरी अद्याप चौकशीत कोणती माहिती बाहेर आली हे कळायला मार्ग नसल्याचे सांगत केंद्र सरकार कासव गतीने तपास करतय का? असा उपरोधिक प्रश्न त्यांनी यावेळी केला.
ऐन निवडणूकीच्या कालावधीत झालेल्या या हल्ल्याने सबंध देश हादरून गेला. मात्र भाजपाने या मुद्याचाही वापर करून घेत फायदा केला आणि भाजपाला फायदा झाला ही. त्यामुळे पुलवामा घटनेत शहिद झालेल्या जवानांना श्रध्दांजली म्हणून तरी चौकशीत काय मिळाले ते जाहिर करावे अशी मागणी त्यांनी यावेळी केली.