मराठी ई बातम्या टीम
आम्ही ममतादीदी सोबत राहणार की काँग्रेससोबत राहणार याची चिंता काहींना वाटतेय. परंतु जे स्वतःला चाणक्य समजत होते त्यांना मात देणारे पवारसाहेब चाणक्य आहेत हे लक्षात घ्यावे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी विरोधकांना टोला लगावला.
या राज्यात शिवसेना आणि काँग्रेस हे दोन पक्ष एकत्र येतील असे कधी कुणी स्वप्नातही पाहिले नव्हते. तशीच परिस्थिती या देशात होणार आहे. बरेच लोक आहेत जे कधी सोबत येणार याची चर्चा होत नाही. परंतु या सगळ्यांची मोट बांधण्याचे काम पवार करतील. कुणालाही याच्यातून बाहेर काढून ही आघाडी होणार नाही. सगळ्यांचा समावेश करायचा आहे यादृष्टीने शरद पवार काम करत आहेत असेही त्यांनी सांगितले.
या देशात विविध प्रश्न निर्माण झाल्यावर ज्यापध्दतीने युपीएच्या बैठका झाल्या पाहिजे होत्या त्या झाल्या नाहीत ही सत्य परिस्थिती आहे. आम्हाला या देशात ममतादीदी, टीआरएस, सपा, आरजेडी, दक्षिणेतील पक्ष या सर्वांची मोट बांधायची आहे. काँग्रेससह एक नवीन आघाडी तयार करायची आहे. सामुहिक नेतृत्व निर्माण करुन ही आघाडी काम करेल असेही त्यांनी स्पष्ट केले.
ममता बॅनर्जी या दोन दिवसाच्या दौर्यावर असताना त्यांनी पवारची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी आमच्या मंत्र्यांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी देशात मोदी सरकारच्याविरोधात असंतोषाचे वातावरण असून सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन एक नवीन पर्याय देण्याची गरज असल्याचे मत मांडले. त्यावर पवारांनी आम्ही सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले.
शरद पवार आणि पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट झाल्यानंतर भाजपासह काही राजकिय पक्षांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यामधील आघाडीवरून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. त्यापार्श्वभूमीवर नवाब मलिक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका स्पष्ट करत आगामी काळात काँग्रेसबरोबरील आघाडी कायम राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.