मुंबई : प्रतिनिधी
कोणतीही पूर्वसूचना न देता सीबीआयने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जावयांना वरळी येथून अटक केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी या देशात कायद्याचं राज्य आहे की, केंद्रातील राज्यकर्त्यांनी या देशात नवीन कायदा केला आहे असा संतप्त सवाल करत सीबीआयने याप्रकरणी खुलासा करण्याची मागणी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जावयाला आणि वकीलांना काही लोकांनी आज संध्याकाळी त्यांच्या निवासस्थानाबाहेर ताब्यात घेतल्यानंतर मलिक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
अनिल देशमुख यांची मुलगी, सुन, जावई आणि वकील वरळी येथील निवासस्थानाबाहेर येत असताना अचानक दहा – बारा जणांनी त्यांची गाडी अडवून वकील व जावई यांना ताब्यात घेतले आणि सोबत घेऊन गेले आहेत. याबाबत कुठलीही माहिती मुलीला किंवा त्यांच्या सुनेला दिलेली नाही असा आरोपही त्यांनी केला.
एकंदरीत ही सर्व कारवाई करण्यात आली ती बेकायदेशीर किंवा नियमाला धरून नाही त्यामुळे सीबीआयने तात्काळ याचा खुलासा करावा अशी मागणीही त्यांनी केली.
अनिल देशमुख यांच्या जावयासह त्यांच्या कुटुंबियांना कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांच्या जावयाला सीबीआयने अचानक अटक केल्याचे सांगण्यात येत आहे. अशा पध्दतीने कोणालाही कधीही अटक करण्यावरून सीबीआय आणि केंद्रातील भाजपा सरकारवर निशाणा साधला आहे .