मुंबई : प्रतिनिधी
कणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल गुरूवारी लागणार असून यात नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची पर्यायाने नारायण राणे यांच्या राजकीय नेतृत्त्वाची कसोटी लागणार आहे.
काँग्रेस सोडल्यानंतर नारायण राणे यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली. त्यानंतर त्यांनी हा पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सामीलही केला. राज्याच्या राजकारणात राहण्याची शक्यता मावळल्यानंतर राणे यांनी भारतीय जनता पार्टीच्या कोट्यातून राज्यसभेवर जाणे पसंत केले. त्यांनी राज्यसभेचा उमेदवारी अर्ज दाखल केला तेव्हा सिंधुदूर्ग जिल्ह्यातील कणकवली नगरपंचायत निवडणुकीची धावपळ सुरू होती. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी कणकवली गाठली. तेथे त्यांनी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत तसेच अन्य नेत्यांशी चर्चा केली आणि कणकवलीत भाजपाने शिवसेनेबरोबर युती जाहीर केली. त्यामुळे राणे यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष रालोआत सहभागी होऊनही एकाकी पडला आणि त्याने राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडी केली.
या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी शिवसेना-भाजपा युतीकडून संदेश पारकर, स्वाभिमान-राष्ट्रवादी आघाडीकडून समीर नलावडे, काँग्रेसकडून विलास कोरगावकर तर शहर विकास आघाडीकडून राकेश राणे रिंगणात उतरले आहेत. त्यामध्ये कोण बाजी मारते हे उद्या स्पष्ट होणार आहे.