मुंबईः प्रतिनिधी
इतिहासात नादिरशहाने दिल्ली जाळल्याची नोंद आहे. त्यामुळे आता नादिरशहानंतर अमित शाह यांचे नाव दिल्ली जळीत प्रकरणामध्ये निश्चितपणे नोंदले जाईल अशी खोचक टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली.
दिल्ली जळत असताना पोलिसांनी हिंसा करणाऱ्यांवर कारवाई केली नाही. पोलिस ‘मूक दर्शक’ बनून राहिले. यामागे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा कारवाई न करण्याचा आदेश होता हे स्पष्ट दिसत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
सोशल मिडिया सोडण्याचा मोदींचा निर्णय देशहिताचा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मिडिया सोडण्याचा निर्णय घेतला हा देशहिताचा आहे. या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो अशी उपरोधिक टीकाही त्यांनी केली.
काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारपासून सोशल मीडिया सोडण्याचे संकेत दिले आहेत. काही भाजपा नेत्यांनीसुद्धा सोशल मीडियामधून बाहेर पडण्याचे सांगितले आहे. सर्व मोदीभक्तांनी देखील सोशल मीडिया सोडला पाहिजे. ते सोशल मीडियामधून बाहेर पडले तर या देशात नक्कीच शांतता नांदेल. त्यामुळे मोदींनी जाहीर केल्याप्रमाणे रविवारपासूनच सोशल मिडिया सोडावी असे आवाहनही त्यांनी केले.