बारामती: प्रतिनिधी
ऐन दिवाळीच्या तोंडावर सर्वसामान्य जनतेला बसणारी महागाईची झळ कमी करण्यासाठी केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट करात कपात करण्याचा निर्णय घेतला. मात्र राज्यात महाविकास आघाडी सरकारकडून कधी असा निर्णय घेणार अशी विचारणा होत असतानाच राज्यातही पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट करात कपात करण्यासंदर्भात राज्य सरकारशी बोलणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि महाविकास आघाडीचे प्रमुख शरद पवार यांनी दिली.
गोविंद बाग येथील अप्पासाहेब पवार सभागृहात आयोजित दिवाळी पाडव्यानिमित्त कार्यक्रमाच्यावेळी काही प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह अन्य नेतेही उपस्थि होते.
केंद्र सरकारने पेट्रोलवर ५ रूपये तर डिझेलवर १० रूपयांची कपात केली. त्यामुळे बाजारात इतक्या रकमेने स्वस्त दरात पेट्रोल-डिझेल उपलब्ध होत आहे. जर राज्य सरकारने या दोन गोष्टींवरील करात कपात केली तर पेट्रोल-डिझेलच्या दरात आणखी कपात केल्यास आणखी किंमती खाली येतील असा अंदाज बांधण्यात येत आहे. मात्र याबाबत अर्थमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडून कोणतेच वक्तव्य करण्यात आले नाही. त्यामुळे राज्य सरकार पेट्रोल-डिझेलवरील कमी करणार की नाही असा सवाल जनतेकडून उपस्थित करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर आता शरद पवार यांनी याप्रश्नी राज्य सरकारशी बोलणार असल्याचे जाहिर केल्याने राज्यात पेट्रोल-डिझेलचे दर आणखी कमी होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
शरद पवार हे महाविकास आघाडीचे प्रमुख आहेत. तसेच त्यांच्याकडून आतापर्यत करण्यात आलेली सूचना राज्य सरकारने अर्थात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी कधीच अव्हेरली नाही. त्यामुळे त्यांच्याकडून बोलणी अर्थात सूचनाच राज्य सरकारला करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आल्याने आता राज्य सरकार पेट्रोल-डिझेलवरील करात कपात करेल असे मानन्यात येत आहे.
याशिवाय शरद पवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या सुरु असलेल्या संपाबाबत भूमिका स्पष्ट करताना म्हणाले की, एसटी कर्मचाऱ्यांमधील काहीजणांकडून संप मिटविण्याची भूमिका आहे. तर काहीजणांची संप मिटू नये यासाठी प्रयत्नशील आहेत. परंतु ऐन सणासुदीच्या काळात नागरीकांना वेठीस धरण्याचे काम संपातील कर्मचाऱ्यांनी घेवू नये अशी सूचना करत हा संप मागे घ्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
तसेच एसटी कर्मचाऱ्यांबाबत राज्य सरकार योग्य निर्णय घेईल असेही ते म्हणाले.