मुंबई : प्रतिनिधी
गतवर्षी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या उशीराने करण्यात आल्या होत्या. तसेच यंदाच्या नव्या आर्थिक चालु वर्षात आपल्या इच्छेच्या, आवडत्या ठिकाणी किंवा रहिवासी असलेल्या जिल्ह्यात बदली व्हावी यासाठी प्रयत्न करण्यास अनेक सरकारी कर्मचारी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रयत्न सुरु केले. मात्र बदलीसाठी प्रयत्नशील असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या या प्रयत्नावर राज्य सरकारने विरजन टाकले असून यंदाच्या नव्या चालु आर्थिक वर्षात फक्त ठराविक कारणासाठीच बदली करण्याचा निर्णय घेतला असून पूर्वीप्रमाणे घाऊक बदल्या न करण्याचे राज्य सरकारने ठरविले आहे. त्यानुसार फक्त या खालील कारणासाठीच संबधित अधिकाऱ्यांची बदली होणार असून त्यासंदर्भात राज्य सरकारनेही नवा आदेश जारी केला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षी नियोजित होणाऱ्या एप्रिल आणि मे महिन्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया जूलै आणि नंतर ऑगस्ट महिन्यात करण्यात आल्या. यंदाच्या वर्षीही एप्रिल आणि मे महिन्यात पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव महाराष्ट्रात वाढू लागल्याने यंदाही नियोजित करण्यात येणाऱ्या बदल्या न करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला.
यंदाच्या वर्षी फक्त सेवानिवृत्तीमुळे रिक्त झालेली जागा भरण्यासाठीच फक्त बदली करण्यात येणार आहे ; तसेच कोरोना प्रादुर्भाव रोखण्याच्या अत्यावश्यक सेवेतील रिक्त पदे भरण्याच्या अनुषंगाने; एखाद्या शासकिय कर्मचाऱ्याच्या विरोधात गंभीर स्वरूपाची साधार तक्रार प्राप्त झाल्यामुळे संबधित कर्मचाऱ्याची बदली करणे प्राधिकृत अधिकाऱ्यास खात्री पटल्यास त्याची बदली करता येणार आहे.
या तीन गोष्टींतंर्गतच बदल्या करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या तीन कारणांशिवाय कोणत्याही स्वरूपात घावूक बदल्या न करण्याचे आदेश राज्य सरकारने सर्व विभागांना बजावले आहेत. त्यामुळे स्वत:च्या आवडत्या ठिकाणी बदलीस इच्छुक असलेल्यांच्या प्रयत्नांवर यानिमित्ताने पाणी फेरले गेले आहे.