Breaking News

अनिल परब म्हणाले की, “त्या” हल्लेखोर कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई एसटी महामंडळाच्या बैठकीनंतर परब यांची माहिती

संप काळात ज्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली त्यांना पुन्हा सेवेत रुजू करण्यात येणार आहे. मात्र जे कर्मचारी शरद पवार यांच्या घरावर हल्ला करण्यात सहभागी झाले होते, त्यांच्यावर मात्र कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज दिली.
एसटीच्या कायद्यामध्ये एखादा कर्मचारी गंभीर गुन्ह्यांमध्ये सामील असेल तर त्याच्याविरुद्ध अशी कारवाई करण्याची तरतूद असल्याचेही त्यांनी सांगितले.
आज एसटी महामंडळाची बैठक झाल्यानंतर परिवहन मंत्री अनिल परब हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी वरील माहिती दिली.
शरद पवार यांच्या घरावर जो हल्ला झाला त्याचे सूत्रधार हे गुणरत्न सदावर्ते हेच आहेत. त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांना भडकावून हा हल्ला घडवून आणला. त्यामुळे त्याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. याशिवाय एसटी कर्मचाऱ्यांना तुमचे शासकीय सेवेत विलीनीकरण करून देतो म्हणून त्यांच्याकडून वसुली करण्यात आली आहे. एसटीचे सुमारे एक लाख कर्मचारी असून त्यांच्याकडून प्रत्येकी पाचशे रुपये प्रमाणे काही कोटी रुपये गोळा केल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे या वसुलीचीही चौकशी केली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
२२ ताखेपासून एसटी पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न –
येत्या २२ तारखेपासून एसटी कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्याने आणि आता कर्मचऱ्यांचा संप संपुष्टात आला आहे. त्यामुळे आता लाल परिला पुन्हा एकदा पूर्वपदावर आणण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. यासंदर्भात मंत्रालयात आयोजित एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांची बैठक आज घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
या बैठकीत एसटीचे कोणते मार्ग सुरू करायच्या आणि किती गाड्या सुरू करायच्या यावर चर्चा करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
एसटी महामंळाच्या कर्मचाऱ्यांची शासकीय सेवेत विलीनीकरण करण्याची मागणी फेटाळत २२ एप्रिलपर्यंत कामावर हजर होण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले. त्यामुळे गेली साडेपाच महिने सुरू आसलेला संप आता निकाली निघाला आहे. न्यायालयाच्या या दणक्याने एसटी कर्मचारी कामावर हजर होतील याची खात्री राज्य सरकारला आहे. त्यामुळे २२ तारखेपासून एसटी वाहतुक पूर्वपदावर आणण्याचे नियोजन सुरू झाले आहे.
आधी कोरोना आणि नंतर संपामुळे एसटी वाहतुक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. त्यामुळे कोणते मार्ग सुरू करायचे, कोणकोणत्या मार्गावर प्राधान्याने वाहतूक सुरू करायची यावर बैठकीत चर्चा करण्यात आली. अनेक बस गाड्या या बंद असल्यामुळे नादुरूस्त झाल्या आहेत. त्यांची दुरस्तीही हाती घ्यावी लागणार आहे. एकंदरच लवकरच एसटी वाहतूक पूर्वपदावर कशी येईल आणि राज्यातील जनतेला दिलासा कसा मिळेल यासाठी प्रयत्न सुरू केले असल्याचेही त्यांनी सांगितले.

Check Also

सीबीएसईने पुन्हा एकदा ११ वी आणि १२ वीचा अभ्यासक्रम बदलला शैक्षणिक संचालक जोसेफ इम्युन्युअल यांची माहिती

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) ने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) २०२० शी संरेखित करण्यासाठी २०२४-२५ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *