Breaking News

मुख्यमंत्री शिंदे यांचे आदेश, मुंबईतील ‘हे’ एमयुटीपी प्रकल्प वेळेत पूर्ण करा सर्व प्रकल्प कालबध्द पध्दतीत पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आदेश

मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्टस (एमयुटीपी) हे मुंबई महागनर (एमएमआर) क्षेत्रातील नागरिकांच्या सुविधेच्या दृष्टीने महत्वाचे आहेत. या प्रकल्पांसाठी राज्य सरकार पूर्ण सहकार्य करेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. हे प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावेत, यासाठी राज्य शासनाच्या संबंधित सर्व यंत्रणांनी भू-संपादन, पुनर्वसन यांसह आर्थिक सहभागाच्या अनुषंगाने प्राधान्याने कार्यवाही करावी, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी हे सर्व प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण व्हावेत, यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देशीत करुन एमएमआरडीएसह अन्य यंत्रणांच्या वित्तीय तसेच करार आदी बाबींवर वेळेत कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
मुंबई रेल्वे विकास कार्पोरेशन (एमआरव्हिसी)च्यावतीने मुंबईत सुरु असलेल्या मुंबई नागरी परिवहन प्रकल्पांबाबत (अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्टस – एमयुटीपी) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे सादरीकरण करण्यात आले.

रेल्वेच्या जमिनीवरील अतिक्रमण, झोपडपट्ट्या हटवण्यासाठी रेल्वेने पुढाकार घ्यावा. झोपडपट्टी विकास प्राधिकरण (एसआरए)प्रमाणेच एक नियोजन प्रणाली राबवण्यात यावी. जेणेकरून मोठ्या प्रमाणात रेल्वेला जमीन उपलब्ध होईल. तसेच अशा रहिवाशांचे सुयोग्य पुनर्वसनही शक्य होईल. यासाठी राज्य शासन आवश्यक ते सहकार्य करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिली.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, एमयुटीपीचे हे प्रकल्प मुंबई (एमएमआर) क्षेत्रातील नागरिकांच्या वाहतूक सुविधेच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहेत. त्यामुळे एमएमआरडीसोबतच अन्य यंत्रणांनी हे प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावेत, यासाठी पूर्ण सहकार्य करणे आवश्यक आहे. आवश्यकता भासल्यास एमएमआरडीएला या प्रकल्पांसाठी आर्थिक वाटा उचलता यावा, यासाठी कर्जाची व्याप्तीही वाढवली जाईल. रेल्वे मंत्रालयाशीही पत्रव्यवहार केला जाईल. हे सर्व प्रकल्प एकाच पद्धतीने आणि सुनियोजितपणे वेळेत पूर्ण व्हावेत यासाठी प्रयत्न केले जातील. भू-संपादन आणि पुनवर्सनाबाबतही स्थानिकांना विश्वासात घेऊन कार्यवाही करावी. बाधितांना आहे त्या ठिकाणीच पुनर्वसनाचा पर्याय उपलब्ध करून देण्यावर भर द्यावा.

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, लोकांसाठी हे प्रकल्प खूप फायेदशीर ठरले आहेत. यापूर्वीच हे प्रकल्प वेगाने आणि वेळेत पूर्ण होणे अपेक्षित होते. त्यामुळे आता या प्रकल्पांना कालबद्ध पद्धतीने वेग दिला पाहिजे. वित्त पुरवठ्यासह, करार आदी बाबींची कार्यवाही तातडीने करण्यात यावी. विकास कामे वेळेत आणि वेगाने पूर्ण झाली पाहिजेत, यासाठी सर्वच यंत्रणांनी समन्वयाने काम करावे लागेल.

यावेळी बैठकीत एमआरव्हिसीच्यावतीने एमयुटीपी-१, एमयुटीपी-२ या प्रकल्पांचा प्रगती अहवाल सादर करण्यात आला. एमयुटीपी – १ मध्ये नऊ वरून बारा डब्ब्यांच्या उपनगरीय गाड्या सुरु करण्यात यश आले. बोरिवली- विरार आणि कुर्ला – ठाणे या जादा मार्गिका सुरु करण्यात यश आले. एमयुटीपी – २ मध्ये सर्व डीसी गाड्यांचे एसीमध्ये परिवर्तन करण्याचा टप्पा पूर्ण करण्यात आला. याशिवाय ठाणे आणि दिवा दरम्यान पाचवी, सहावी मार्गिकाही सुरु करता आल्याची माहिती देण्यात आली. एमयुटीपी – २मध्येच सीएसएमटी-कुर्ला पाचवी, सहावी मार्गिका आणि मुंबई सेंट्रल-बोरीवली सहावी मार्गिका हे प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यात येणार आहेत. एमयुटीपी-३ मध्ये पनवेल – कर्जत हा प्रकल्प ३९ टक्के, ऐरोली-कळवा हा प्रकल्प ४३ टक्के पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आली. याशिवाय मार्गिका सुरक्षा उपाय आणि अन्य सुविधाही ५७ टक्के पूर्ण झाल्या आहेत. एमयुटीपी – ३ ए मध्ये बोरीवली- विरार पाचवी व सहावी मार्गिका तसेच गोरेगांव-बोरीवली हार्बर लाईनचा विस्तार, कल्याण-बदलापूर तिसरी व चौथी मार्गिका, कल्याण-असनगांव चौथी मार्गिका या प्रकल्पांसह सुमारे १८ स्थानकांचा विकास असे प्रकल्प नियोजित असल्याची माहिती देण्यात आली. या प्रकल्पांसाठी आवश्यक वित्तीय सहभागाबाबतही चर्चा झाली.

बैठकीस राज्याचे मुख्य सचिव मनु कूमार श्रीवास्तव, नगर विकास विभागाचे अतिरीक्त मुख्य सचिव भूषण गगराणी, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरा, वन विभागाचे प्रधान सचिव वेणु गोपाल रेड्डी, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी, मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलारसू, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी, एमआरव्हिसीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक सुभाष चंद गुप्ता, मुंबई मेट्रो रेल कार्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) चे अतिरिक्त आयुक्त के. एच. गोविंदराज, नवी मुंबई महापालिकेचे आय़ुक्त राजेश नार्वेकर, ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे तसेच एमआरव्हिसीच्या विविध विभागांचे संचालक, रेल्वे भूमी विकास प्राधिकरणाचे अधिकारी आदी उपस्थित होते.

Check Also

निवडणूक प्रक्रिया निर्भय वातावरणात होण्याच्या दृष्टीने यंत्रणांनी सतर्क रहावे

केंद्रीय निवडणूक आयोगाच्यावतीने लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पारदर्शक,निर्भय आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *