Breaking News

एमएमआरडीए मुंबईकरांच्या स्वप्नांना आकार देणारे विकासाचे माहेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन

मुंबईकरांच्या स्वप्नांना आकार देणारे आणि विकासाचे माहेर असलेले मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजे राज्याचे ग्रोथ इंजिन असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

येथील वांद्रे कुर्ला संकुल येथील कन्व्हेशन सेंटर येथे ‘एमएमआरडीए’ च्या ५० व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

कार्यक्रमास कौशल्य, रोजगार आणि उद्योजकता विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, माहिती व तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार राजन नाईक, नगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ता, अतिरिक्त महानगर आयुक्त विक्रम कुमार, आश्विन मुद्गल, सह महानगर आयुक्त राधा विनोद शर्मा यांच्यासह ‘एम एम आर डी ए’ चे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.

राज्यातील जनतेला मिळालेल्या सोयी सुविधांचा उत्सव म्हणजे आजचा उत्सव विकासाचा ही संकल्पना असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, वेगवान आणि गतिमान विकासाचे शिल्पकार असलेल्या ‘एमएमआरडीए’ च्या टीमचे अभिनंदन करतो. विकास, वारसा आणि संस्कृती यांचा उत्तम मिलाफ ‘एमएमआरडीए’ मध्ये पहायला मिळतो. पुढील पिढीला या विकासाची फळे चाखायला मिळणार आहेत. मुंबई सह ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्याच्या विकासात प्राधिकरणाचा मोठा वाटा आहे. साडेसहा हजार चौरस किलोमीटर क्षेत्रात आणि साडेतीन कोटी लोकसंख्या असलेल्या परिसराचा विकास प्राधिकरण करत आहे. सल्लागार म्हणून स्थापन झालेली ही संस्था आज वेगाने विकासकामे करत असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ३ लाख कोटी पेक्षा जास्त किमतीची कामे सुरू असणारे हे देशातील एकमेव प्राधिकरण आहे. राज्याची अर्थव्यवस्था १ ट्रिलियन करण्याचा उद्देश आहे. पण एकट्या ‘एम एम आर डी ए’ क्षेत्रात दीड ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे सामर्थ्य आहे. जगाचे आर्थिक केंद्र होण्याचे क्षमता महानगर प्राधिकरण क्षेत्रात आहे. ही क्षमता निर्माण करणारे प्राधिकरणाचे अधिकारी आणि कर्मचारी यांचे मी अभिनंदन करतो.

राज्य आज थेट परकीय गुंतवणुकीच्या क्षेत्रात क्रमांक एकवर असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, दावोस येथे आतापर्यंतच्या गुंतवणुकीचे सर्व रेकॉर्ड तोडले जातील असा विश्वास आहे. लोकांच्यासाठी शासन काम करत आहे. लोकांना सर्व सोयीसुविधा देणे यासाठी शासन काम करत आहे. मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प आता ‘एम एम आर डी ए’, महापालिका, सिडको, म्हाडा यांच्या माध्यमातून राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हे प्रकल्प लवकर पूर्ण होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार म्हणाले की, प्राधिकरण ने ५० वर्षात मोठी झेप घेतली आहे. अशीच शतकी झेप घ्यावी अशा शुभेच्छा देतो. इतक्या मोठ्या प्रमाणावर विकासकामे करणारी दुसरी संस्था नाही.

यावेळी ‘एमएमआरडीए’ च्या विविध शाखांचे व अधिकारी यांचा उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच प्राधिकरणाचे बोधचिन्ह, कॉफी टेबल बुक प्रकाशन ही करण्यात आले. अशोक हांडे आणि त्यांचा पथकाने मराठी बाणा हा कार्यक्रम सादर केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विक्रम कुमार यांनी तर आभार प्रदर्शन राधा विनोद शर्मा यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *