राज्याचे माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे हे सेवानिवृत्त झाल्यापासून रिक्त असलेल्या राज्याच्या मुख्य सचिव पदाची जबाबदारी आता गृहविभागाचे अप्पर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्रीवास्तव यांनी राज्याचे प्रभारी मुख्य सचिव असलेल्या देबाशिष चक्रवर्ती यांच्याकडून मुख्य सचिव पदाचा पदभार आज स्विकारला. मनुकुमार श्रीवास्तव हे १९८६ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. या पदासाठी अतिरिक्त मुख्य सचिव तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अप्पर मुख्य सचिव मनोज सौनिक आणि महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव नितीन करीर हेही प्रयत्नशील होते.
मनुकुमार श्रीवास्तव यांनी यापूर्वी गृहनिर्माण विभाग, नगरविकास विभाग आणि महसूल विभागाचे सचिव म्हणून अनेक वर्षे काम केलेले आहे. त्यांच्याकडे एकदा फाईल गेली की ती नियमानुसारच मंजूर होणार असल्याचा विश्वास मंत्रालय प्रशासनात निर्माण झालेले आहे. मात्र दुसऱ्याबाजूला त्यांच्याकडे गेलेल्या अनेक फाईली या वेळेत मंजूर होत नसल्याची तक्रारही काहीजणांकडून होत असे. तसेच ते आपल्या प्रशासकीय टिपण्णीवर आतापर्यंत ठाम राहीलेले आहेत. त्यांनी एकदा शेरा मारला की त्यात कधीच बदल झाला नाही.
परंतु फडणवीस सरकारच्या काळात शासकिय जमिनी मालकी हक्काने देण्याचा निर्णय तत्कालीन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. या निर्णयामुळे राज्य सरकारच्या तिजोरीत फारशी भर पडणार नसल्याचे दिसत असल्याने त्यांनी बाजारमुल्याच्या ७५ टक्के शुल्क आकारून या जमिनी मालकी हक्काने देण्याचा अभिप्राय दिला. त्यावर पुन्हा फडणवीस आणि चंद्रकांत पाटील श्रीवास्तव यांना बोलावून दिलेला अभिप्राय बदलण्यास सांगितले. त्यानुसार श्रीवास्तव यांनी आपणच लिहिलेला अभिप्राय बदलत मालकी हक्काने जमिनी ७५ टक्केऐवजी २५ टक्के शुल्क इतके खाली आणले.या एका प्रस्तावाचा अपवाद वगळता मनुकुमार श्रीवास्तव यांच्या कार्यशैलीबद्दल समाधान व्यक्त करण्यात येते.