मुलाच्या मृत्यूनंतर वारस म्हणून असलेल्या संबंधित मुलाच्या हयात असलेल्या आईला मयत दाखवून तिच्या नावावर असणाऱ्या हक्काच्या पैशांची लुबाडणूक करण्यात आल्याची बाब दलित पँथर या संघटनेने मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री व पोलीस महासंचालक यांच्या निदर्शनात आणून दिली आहे या प्रकरणात दोषी असलेल्या सर्व संबंधितांची एस आयटीमार्फत चौकशी करून त्या विधवा आणि वृद्ध महिलेला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी या संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुखदेव सोनवणे यांनी केली आहे.
विमल बाळकृष्ण वळसे हि वृद्ध व विधवा महिला गाव मौजे जवळे निरगुडसर ता. आंबेगाव जिल्हा पुणे या ठिकाणी राहते तिला सतीश आणि संदीप हि दोन मुले असून त्यापैकी सतीश याचे लग्न झाले असून त्याला पत्नी जयश्री व आरोही ही अल्पवयीन मुलगी आहे सतीश हा कॅपजेमिनी लिमिटेड तळावडे पुणे येथे आयटी इंजिनियर म्हणून कामाला होता सदर कंपनीच्या विमा पॉलिसीमध्ये विमल यांची ५० टक्के व सतीशची पत्नी म्हणून जयश्री याना ५० टक्के अशी वारस म्हणून नोंद असून प्रॉव्हिडंट फंड खात्यात विमल यांची १०० टक्के वारस म्हणून सतीश याने नोंद केलेली आहे.
दरम्यान सतीश वळसे व त्याची मुलगी आरोही या दोघांचा सन २०२० मध्ये खेड राजगुरूनगर येथे जड वाहनाच्या धडकेत जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे त्याची आई विमल व पत्नीचा एकुलता एक कमावता आधार गेला, या धक्क्यातून सावरल्यानंतर मयत सतीशची आई आपल्या हक्काचे पैसे मिळण्यासाठी विमा कार्यालय व कंपनीच्या कार्यालयात गेली असता सदर महिलेच्या नावाने बनावट मृत्यू दाखला बनवून विम्याचे आणि प्रॉव्हिडंट फंडाचे २ कोटी ७० लाख रुपये सतीशची पत्नी जयश्री हिला एकटीलाच देण्यात आल्याची धक्कादायक माहिती कंपनीमार्फत देण्यात आली.
यासंदर्भात सदर वृद्ध महिला व तिचा हयात मुलगा संदीप याने संबंधित खेड पोलीस ठाणे , मंचर पोलीस ठाणे तसेच पुणे ग्रामीण याठिकाणी वारंवार जाऊन तक्रार तसेच दाद मागण्याचा प्रयत्न केला असता खेडचे पोलीस उप निरीक्षक राहुल लाड यांनी काम करून देतो म्हणून विमल यांच्याकडे आगाऊ २० लाख रुपयांची मागणी करीत १० लाख रुपयांचा बँक ऑफ बडोदाचा चेक घेतला तसेच पोलीस कर्मचारी रवींद्र दिलीप वाघ यांच्या नावाने देखील १० लाख रुपयांचा चेक घेतला असल्याचा आरोप दलित पँथरच्या निवेदनात करण्यात आला आहे. त्यांच्यप्रमाणे मंचर पोलीस ठाण्याचे कान्स्टेबल बीएस कांबळे आणि पोलीस निरीक्षक होडगर यांनीदेखील ३० लाख रुपयांची मागणी विमल यांचा जिवंत लहान मुलगा संदीप यांच्याकडे केली. सदर पैसे हे मंत्री तसेच वरपर्यंत द्यावे लागतात असे त्यांना सांगन्यात आल्याची तक्रार दलित पँथरच्या वतीने मुख्यमंत्र्याकडे करण्यात आली आहे.
सदर फसवणुकीची तक्रार पोलीस अधीक्षक कार्यालय पुणे ग्रामीण यांच्याकडे केल्यानंतर १० ऑगस्ट २०२२ रोजी तपास अधिकारी अर्जुन मोहिते यांनी विमल यांना कॅंटीनमध्ये बसायला सांगून संदीप याना टॉर्चर रूममध्ये पट्ट्याने व लाथाबुक्क्याने प्रचंड मारहाण करीत त्याचा मोबाईल तसेच कंपनीची ओरिजनल कागदपत्रे जबरदस्तीने काढून घेतली आणि पुन्हा या ठिकाणी यायचे नाही अशी धमकी देण्यात आल्याचे सोनवणे यांनी मुख्यमंत्र्याकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
विमल यांचा एकुलता एक कमावता मुलगा गमावला असताना व ती हयात असताना तिच्या मृत्यूची बनावट कागदपत्रे बनविणे , कंपनी तसेच प्रॉव्हिडंट फंडातील हक्काचे पैसे फसवणूक करून काढून घेणे पोलिसांकडून आर्थिक फसवणूक व मारहाण होणे कंपनीची ओरिजनल कागदपत्रे कडून घेणे हे सर्व प्रकार अतिशय गंभीर असून या संपर्ण प्रकरणाची एस आय चौकशी करावी , कंपनी, प्रॉव्हिडंट फंड कार्यालय मृत्यू दाखल देणारे संबंधित कर्मचारी व विमल यांची सून जयश्री यांच्याविरोधात फसवणूक करणे बनावट कागदपत्रे बनविणे या प्रकरणी गुन्हा दाखल करावा या प्रकरणात त्यांना सहकार्य करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी करवून त्यांच्याविरोधात एस आय टी चौकशी करून कारवाई करावी व विमल या विधवा वृद्ध महिलेला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.