मराठी ई-बातम्या टीम
मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या मालवणी येथील टिपू सुलतान क्रिडा संकुलावरून आता शिवसेनेने सावध भूमिका घेत या नामकरणाचा कोणताही अधिकृत प्रस्ताव मुंबई महापालिकेत किंवा राज्य सरकारकडून आलेला नसल्याचे सांगत ते नाव अधिकृत नाही. या अनुषंगाने भाजपाच्या नेत्यांनी २०१६ आणि २०१७ मध्ये पत्र व्यवहार केला होता याची आठवण मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी करून देत यासंदर्भात महासभेतही चर्चा करण्यात आली होती असे सांगत महासभेचे वृत्त मान्य नसेल तर भाजपाने खुशाल न्यायालयात जावे असे आवाहन आज दिले.
काल २६ जानेवारी २०२२ रोजी भाजपाने केलेल्या आंदोलनानंतर भाजपाने आज मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना आव्हान देत याविषयीची माहिती देण्याची मागणी केली होती. त्यानंतर पेडणेकर यांनी आज प्रसार माध्यमांशी बोलताना वरील आव्हान दिले. त्यामुळे टिपू सुलतान नामकरण प्रकरणी वाद शमण्याची चिन्हे दिसत आहेत.
मुंबईतील शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करु नका असा इशारा भाजपाला देत त्या पुढे म्हणाल्या की, कालचा अख्खा दिवस कायदा सुव्यस्था बिघडवण्याचा होता. ज्यांनी यामध्ये कालच्या आंदोलनात उड्या मारल्या त्यांनी आधी, तुमचा विरोध २०१९ पासून सुरु आहे का याचे उत्तर द्यावे असा खोचक सवाल करत आत्ताच या नावाला विरोध का होत आहे आणि मुख्यमंत्री शिवसेनेचे आहेत म्हणून मूळव्याध सतत सतवतो आहे का माझा प्रश्न आहे. आज मुंबईत दोन वर्षे करोनामध्ये सर्वच लोक होरपळून निघालो आहोत. त्यानंतर आता असे प्रकार सुरु आहेत. एक माजी आमदार दंगल होणार असे म्हणत आहे. दंगल कुणाला हवीय आणि करुन तर दाखवा. या मैदानाला नाव देण्याचा महापालिकेसोबत आणि आत्ताच्या राज्य सरकारसोबत संबंध नाही. आमच्याकडे असा कुठलाही प्रस्ताव नाही त्यामुळे साप म्हणून दोरी आपटण्याचे काम भाजपाकडून सुरु आहे. या वादामध्ये सतत शिवसेनेला खेचण्याचा प्रयत्न केला जात आहे. मुंबई अस्थिर करण्याच्या कामामध्ये वेळ घालवण्यापेक्षा तुम्ही विकास कामांकडे बघा असा उपरोधिक टोला लगावत मी पुरावे देत आहे आणि ते खोटे वाटत असतील तर तुम्ही ते सिद्ध करा असे आव्हानही त्यांनी भाजपाला दिले.
मुंबईमध्ये भाजपाच्या अध्यक्षतेखाली दोन रस्त्यांना नावे देण्यात आली होती. मुंबईची शांती कोणाला बिघडवायची आहे आणि कोणाला दंगल हवी आहे? एका नावावरुन एवढा मोठा वाद निर्माण करण्यात आला आहे. त्या नावाला अजून मान्यताच दिलेली नाही किंवा दिली जाईल. झाशीची राणी लक्ष्मीबाई नाव देण्याची मागणी आमची आहे. त्या विभागातील नगरसेवकाला कोणते नाव द्यायचे हा अधिकार आहे. ते नाव नागरिक सुचवतात असा आत्तापर्यंतचा नियम आहे. आम्ही सुचवलेल्या नावावर एक शब्दही बोलला जात नाही. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना एकनाथ खडसेंच्या पत्रामध्ये वीर टीपू सुलतान क्रीडांगण असा उल्लेख आहे. क्रीडा संकुलाला दिलेले नाव महापालिकेच्या अधिकृत पटलावर अद्याप नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुंबईमध्ये कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचे काम भाजपा का करत आहे हा प्रश्न मुंबईकरांना पडला आहे. सभावृत्तांत हा आमच्या घरी नसतो. त्यामध्ये खाडाखोड झाल्याचे वाटत असेल तर नक्की त्याची शहानिशा करा आणि त्यासाठी मी पाठपुरावा करेन. खोटी कामे करणे आम्हाला बाळासाहेबांनी शिकवले नाही. त्यामुळे कितीही प्रसंग आला तरी आम्हीच खरंच बोलत राहणार. पण मुंबईच्या नागरिकांना अस्थिर करण्याचे काम करु नका आणि करायचीच असेल तर मैदानात या असे आव्हानही त्यांनी यावेळी दिले.