Breaking News

मुंबईकरांच्या पाण्याचा “व्यापार” कसा सुरु भाजपा नेते आमदार अॅड आशिष शेलार यांचे आवाहन

मराठी ई-बातम्या टीम

मुंबई महापालिका समुद्राचे पाणी गोडे करण्यासाठी १८,००० कोटी खर्च करण्याचे प्रस्तावित करते आहे. त्यावेळी मुंबईत होणारी प्रचंड मोठी पाणी चोरी, टँकर माफीया आणि त्यातून होणारी अंदाजे ३,००० कोटींची बेकायदेशीर अनियंमित उलाढाल “हेही” एकदा तपासून पहा. ही चोरी रोखून, कारवाई करुन मुंबईकरांचा पैसा “पाण्यात” घालू नका, असे आवाहन भाजपा नेते आमदार अॅड आशिष शेलार यांनी पत्र लिहून पालिका आयुक्त आणि भूजल आयुक्तांना केले.

पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल आणि भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रण आयुक्‍त सी.डी. जोशी यांच्‍याकडे पत्र लिहून भाजपा नेते आमदार अॅड. आशिष शेलार यांनी

मुंबईसह एमएमआर मधील पाणी चोरी व पाण्याचा होणारा बेसुमार उपसा याबाबत काही गंभीर बाबी निदर्शनास आणून दिल्या आहेत. तसेच यावर एस आय टी नियुक्त करुन चौकशी करुन कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली.

केंद्रीय भूजल विभागाने केलेल्या सर्वेक्षणानुसार मुंबई शहरात १९,००० पेक्षा जास्त पाण्याच्या विहिरी आहेत. ज्यापैकी १२,५०० बोअरवेल आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेने २५१ जलकुंभांना नोटिसा बजावल्या असून त्यापैकी २१६ अवैध जलविहिरी असून यातील एकाच जलकुंभातून ८० कोटी रुपयांची पाणीचोरी झाल्याचेही बाब काही प्रसिध्‍दी माध्‍यमांनी समोर आणली.

यावर कोणतेही नियमन किंवा कायद्याची कडक अंमलबजावणी होत नसल्यामुळे अवैध पाणी टँकर माफियांचे फावले असून मुंबई विभागात ३,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या पाण्याची लूट करत असल्याचा अंदाज व्‍यक्‍त केला जात आहे. त्‍यामुळे मुंबईतील बेकायदेशीर व अनियंत्रित पाणी चोरीचा तपास करून त्‍यांना दंड आकारून ही चोरी थांबवणे आवश्‍यक आहे. मुंबईच्या विद्यमान भूजल संसाधनाच्या वापराची क्षमता  लक्षात घेऊन वैज्ञानिकदृष्ट्या अभ्‍यास करून पाणी वापराचे धोरण निर्धारित करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

म्‍हणून बृहन्मुंबई महानगरपालिका आणि मुंबई महानगर प्रदेशातील अन्‍य नगरपालिकांच्या समन्वयाने त्वरित याबाबत एक एसआयटी कमिटी गठीत करून चौकशी होणे आवश्यक आहे. ज्यांनी कोणत्याही परवानगी किंवा नियमांशिवाय भूजलाचा अतिरीक्त शोषण करीत पाणी उपसा केला आहे या प्रकरणी दोषी आढळतील अशांवर तातडीने एफआयआर दाखल करुन त्‍यांच्‍यावर दंडात्‍मक कारवाई करण्‍यात यावी., मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशाची विद्यमान भूजल क्षमता याचा अभ्‍यास करुन पाणी उपसा किती प्रमाणात झाला पाहिजे याचे धोरण निश्चित करण्‍यात यावे अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

तसेच मुंबई  आणि मु्बई महानगरातील मैदाने, बागा यांसाठी लागणारे पाणी याची आवश्‍यकता लक्षात घेऊन आवश्‍यक असणारे पाणी उपलब्‍ध व्‍हावे म्‍हणून सर्व महापालिकांनी स्‍वतःचे जलसंचयन धोरण ठरवून ते कार्यान्‍वयीत करण्‍याबाबत कार्यवाही करावी, अशा मागण्या करत एकीकडे गारगाई धरणाचा प्रस्ताव रद्द करुन मुंबई महापालिका १८,००० कोटी खर्च करुन जेव्हा समुद्राचे पाणी गोडे करण्यासाठी खर्च करणार आहेत अशावेळी मुंबईत पाण्याचा “बाजार” करुन सुमारे ३ हजार कोटींचे बेकायदेशीर रॅकेट चालवले जात असून मुंबईकरांच्या पाण्याचा “व्यापार” कसा सुरू आहे असा सवालही त्यांनी यावेळी केला.

Check Also

निवडणूक प्रक्रिया निर्भय वातावरणात होण्याच्या दृष्टीने यंत्रणांनी सतर्क रहावे

केंद्रीय निवडणूक आयोगाच्यावतीने लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पारदर्शक,निर्भय आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *