मुंबई: प्रतिनिधी
साकीनाका येथील पिडीत प्रकरणात अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करावा, कुटुंबियांना शासनाने आर्थिक सहाय्य करण्यासह शासनाची सदनिका द्यावी गुन्ह्यातील बाकिच्या आरोपींना अटक करावी यासह इतर मागण्यांसाठी भीम आर्मी भारत एकता मिशन सामाजिक संघटनेने आज साकीनाका पोलीस ठाणे येथे जोरदार निदर्शने केली.
भीम आर्मी मुंबईच्यावतीने आयोजित या कार्यक्रमात या संघटनेचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे, महाराष्ट्र उपाध्यक्ष सुनील थोरात, रमेश बालेश, महासचिव अविनाश कांबळे, मुंबई वरिष्ठ उपाध्यक्ष योगिनीताई पगारे, दिनेश शर्मा, अविनाश गरूड, कृष्णा दांडगे, संतोष वाकळे, विजय कांबळे, मनीषाताई उबाळे, क्रांती खाडे, जयश्री कांबळे, फातिमा शेख, तृप्तीताई वाघमारे, नागेश कांबळे, यांच्यासह या संघटनेचे कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पोलिसांनी पिडीतेच्या कुटुंबियांना घेऊन कालच घाईघाईने अंत्यसंस्कार उरकले. यावर भीम आर्मी ने यावेळी तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी साकीनाका पोलीस ठाणे यांच्यामार्फत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले असून पुणे अमरावती व गोरेगाव पश्चिम पोलिस ठाणे येथे अशाच प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत. यासाठी महाराष्ट्रासाठी आवश्यक असलेला शक्ती कायदा लवकरात लवकर अंमलात आणावा. साकीनाका प्रकरणातील ईतर आरोपींचा लवकरात लवकर शोध घेऊन सर्व आरोपींविरोधात ३०७, ३७६ भादंवि कलमांसह ३०२ व अॅट्रॉसिटी कायद्याखाली गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली.
साकीनाका पिडीतेला दोन लहान मुली व वृध्द आई असून त्यांच्या संगोपनाची जबाबदारी राज्य सरकारने घ्यावी. तसेच विशेष बाब म्हणून रूपये ५० लाखाचे आर्थिक सहाय्य करावे, पिडीतेच्या कुटुंबियांना शासनाची एक सदनिका द्यावी, गोरेगाव पश्चिम पोलिस ठाणे अंतर्गत मार्च ३७६/२०२१ मध्ये दाखल गुन्ह्यातील आरोपीला शोधण्यास दिरंगाई करणा-या व अॅट्रोसिटी गुन्हा न लावणा-या संबंधित पोलिस अधिका-यांविरोधात निलंबनाची कारवाई करावी, अमरावती व पुणे गुन्ह्यातील आरोपींवर कडक कारवाई करावी. अशा मागण्या या निवेदनाच्या माध्यमातून यावेळी करण्यात आल्या. दरम्यान भीम आर्मीच्या पदाधिका-यांनी यावेळी पिडीतेच्या कुटुंबियांची घरी जाऊन भेट घेतली व या प्रसंगात भीम आर्मी न्याय मिळवून देईल असे आश्वासन दिले.