Breaking News

आर्यन खान प्रकरणातील महत्वाचा साक्षीदार प्रभाकर साईलचा मृत्यू गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांचे चौकशीचे आदेश

एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी कॉर्डीलिया क्रुझवर केलेल्या कारवाईत बॉलीवूड स्टार शाहरूख खान पुत्र आर्यन खान यास अटक केली. मात्र ही कारवाई बनावट असल्याची माहिती उघडकीस आणणारा आणि या प्रकरणातील महत्वाचा साक्षीदार प्रभाकर साईल याचा मृत्यू झाला. मात्र साईल याच्या मृत्यूची चौकशी करण्याचे आदेश गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी पोलिस महासंचालकांना दिले.
प्रभाकर साईल याला त्याच्या चेंबूर येथील राहत्या घरी हद्यविकाराचा झटका आल्याचे सांगण्यात येते. मात्र त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र कालांतराने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिल्याचे त्यांच्या पत्नीने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
आर्यन खान याच्यावर एनसीबीने केलेल्या कारवाईतील घटनाक्रम साईलने उघडकीस आणल्यानंतर एनसीबी आणि समीर वानखेडे यांच्या कार्य पध्दतीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. तसेच या संपूर्ण घटनेचा तपास करण्यासाठी एनसीबीने एक टीमही पाठविली होती. याशिवाय राज्य सरकारकडूनही या प्रकरणाचा स्वतंत्र तपास सुरु करण्यात आला होता. मात्र आता मध्येच साईल याचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ माजली आहे.
या घटनेची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेसकडून साईल याच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागी करत हा मृत्यू नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त केला. तसेच सीआयडी चौकशीची देखील मागणी केली. या पार्श्वभूमीवर आज राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलीस महासंचालकांना चौकशी करण्यासंबंधी आदेश दिले.
यासंदर्भात गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की, ही अतिशय अचानक घडलेली घटना आहे आणि यासंदर्भात निश्चितप्रकारे संशय निर्माण होण्यासारखी परिस्थिती आहे. या संदर्भात राज्याच्या पोलीस महासंचालकांना चौकशी करण्यासाठी मी आदेश दिलेले आहेत.
तर, प्रभाकर साईल यांचा मृत्यू काल त्यांचे चेंबूर येथील माहुल भागातील राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने झाला असल्याची माहिती त्यांचे वकील वकील तुषार खंदारे यांनी दिली आहे.
आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात ज्या क्रूझवरून अटक करण्यात आली होती, त्या क्रूझबाहेर आपण हजर होतो, असा दावा प्रभाकर साईल यांनी केला होता. त्यानंतर त्यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचं सांगत संरक्षणासाठी मुंबई पोलीस आयुक्तांकडे धाव देखील घेतली होती.

Check Also

ऐन निवडणूकीच्या धामधुमित सहा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

महाराष्ट्रासह देशभरात लोकसभा निवडणूकीच्या प्रचारातील काँग्रेस आणि भाजपामधील आरोपा प्रत्यारोपामुळे राजकिय वातावरण चांगलेच तापत आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *