Breaking News

मुंबईत रेल्वे विकासाची ६५ हजार कोटींची कामे सुरु तर महाराष्ट्रात ७० हजार कोटींची रेल्वे विकासाची कामे

नवी दिल्ली : प्रतिनिधी

महाराष्ट्रातील रेल्वे विकासाच्या विविध  प्रकल्पांसाठी १ लाख ३५ हजार ५७ कोटी रुपयांची कामे गेल्या चार वर्षात हाती घेण्यात आली आहेत. यातील सर्वाधिक कामे एकट्या मुंबईत रेल्वे विकासासाठी ६५ हजार ७२४ कोटी रुपयांची कामे ही एम.यू.टी. पी. अंतर्गत करण्यात येत आहेत.

या अंतर्गत नवीन रेल्वे मार्ग, दुपदरीकरण, रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण याबरोबरच मुंबई उपनगरीय रेल्वे वाहतूक दुपदरीकरण व मुंबई शहर वाहतूक प्रकल्पांतर्गत ( एम.यु.टी.पी) रेल्वे वाहतूक विस्तार आदी महत्वपूर्ण विकासकामे गेल्या चार वर्षात हाती घेण्यात आली आहेत.

६९ हजार कोटींची कामे प्रगतीपथावर

नवीन रेल्वे मार्ग, दुपदरीकरण, चौपदरीकरण व रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण, गेंजपरिवर्तण या कामांसाठी ६९ हजार ९३३ कोटी रुपयांची कामे हाती घेण्यात आली आहेत, यामध्ये राज्यातील १८१६ कि.मी. लांबीच्या नवीन १४ मार्गांसाठी ३१ हजार ४४८ कोटी ७८ लाख रुपयांची कामे प्रगतीपथावर आहेत,यातील ७७१ कोटी रुपयांची कामे सार्वजनिक खाजगी भागीदारीतून करण्यात येत आहेत.

राज्यातील १० मार्गांचे दुपदारीकरण होत असून एकूण १३३० कि.मी. लांबीच्या या कामांसाठी १२ हजार ९४२ कोटी रुपये खर्च करण्यात येत आहेत, तर १०८२ कि.मी. लांबीचे १३ मार्ग तीन पदरी करण्यात येत आहेत,या कामासाठी १६ हजार ८१९ कोटी रुपये खर्च करण्यात येत आहेत.

रेल्वे मार्ग विद्युतीकरणासाठी ४ हजार कोटी

सन २०१४ पासून राज्यातील ७३० कि.मी. लांबीच्या मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे . आता राज्यातील १७ मार्गावरील २२०९ की.मी. लांबीच्या मार्गांचे विद्युतीकरण हाती घेण्यात आले असून या प्रकल्पासाठी ४ हजार ३२६ कोटी ४५ लाख रुपये खर्च करण्यात येत आहेत. या बरोबरच २१ नवीन रेल्वे मार्गासाठी सर्वेक्षण करण्यात येत आहे.

मुंबई शहर वाहतुकीसाठी ६५ हजार कोटींची कामे

मुंबई शहर वाहतूक प्रकल्प (एम.यु.टी.पी) टप्पा ३ व टप्पा ३अ साठी एकूण ६५ हजार ७२४ कोटी रुपयांची कामे हाती घेण्यात आली आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी डिसेंबर २०१६ साली एम.यु.टी.पी. अंतर्गत १०,९४७ कोटी रुपयांच्या कामाचा शुभारंभ केला आहे. यामध्ये पनवेल-कर्जत नवीन उपनगरीय मार्गाच्या कामाचा समावेश आहे,यासाठी २७८२ कोटी रुपये तर ४७६ कोटी रुपयांच्या ऐरोली- कळवा उन्नत मार्गाच्या कामाचा समावेश आहे.  विरार – डहाणू या मार्गाच्या चौपदरीकरण कामासाठी ३५७८ कोटी रुपयांची कामे हाती घेण्यात आली आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल हा जलद उन्नत कॉरिडॉर,विरार-वसई -पनवेल नवीन उपनगरीय कॉरिडॉर, हार्बर मार्गाचा गोरेगाव- बोरिवली असा विस्तार, कल्याण – आसनगाव या मार्गावर चौपदरीकरण तसेच विविध रेल्वे स्टेशनची सुधारणा यासाठी मुंबई शहर वाहतूक प्रकल्पांतर्गत ५४ हजार ७७७ कोटी रुपयांची कामे प्रगतीपथावर आहेत.

अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी सातत्याने वाढीव तरतूद

महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी गेल्या चार वर्षापासून वाढीव तरतूद करण्यात येत आहे. सन २०१४ ते २०१८ या काळात महाराष्ट्रासाठी प्रतिवर्षं सरासरी  ४३४५ कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे, यापूर्वी ही तरतूद प्रतीवर्षं ११७१ कोटी इतकी होती.

Check Also

निवडणूक प्रक्रिया निर्भय वातावरणात होण्याच्या दृष्टीने यंत्रणांनी सतर्क रहावे

केंद्रीय निवडणूक आयोगाच्यावतीने लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पारदर्शक,निर्भय आणि …