मुंबई: प्रतिनिधी
शहरात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांची संख्या वाढीस लागल्याने या संख्यावाढीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांनी मुंबईत पुन्हा एकदा एकापेक्षा जास्त व्यक्तींना एकत्रित येण्यावर बंदी घालत कलम १४४ लागू करण्यात आला आहे. तसेच बाजार, मंदीर आदीसह कोणत्याही परिसरात एकापेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा मुंबई पोलिस उपायुक्त शहाजी उपम यांनी दिला.
मागील काही दिवसांपासून मुंबईत नियंत्रणात अर्थात एक हजार कोरोनाबाधितांच्या संख्येवर नियंत्रण मिळण्यात प्रशासनाला यश आले होते. परंतु आता पुन्हा ही संख्या २ हजारापार जात असल्याने मुंबई पोलिसांनी कलम १४४ लागू करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
तसेच हे कलम आज १७ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२० पर्यत लागू राहणार आहे. त्यामुळे या कालावधीत नागरिकांना एकापेक्षा अधिकजण येणाऱ्यावर निर्बंध घालण्यात आले आहे. यातून आरोग्य सेवा, अत्यावश्यक सेवा, होम डिलीव्हरी करणारे, मेडिकल स्टोअर्स, बँकिंग, वीज, स्टॉक एक्सचेंज, स्टॉक ब्रोकर, सेबी, आयटी क्षेत्राशी संबधित, प्रसारमाध्यमे, पोर्ट, ई-कॉमर्सवाले, पाणी पुरवठा, गोडाऊन-वेअर हाऊसिंग, ट्रक-टेम्पो आदींना यातून वगळण्यात आले आहे.