मुंबई: प्रतिनिधी
‘मुंबई महाराष्ट्राची होती… आहे… आणि राहिल’, असे जोरदार प्रत्युत्तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना दिले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात जनता दरबाराला उपमुख्यमंत्री अजित पवार आले असता माध्यमांनी त्यांच्याशी संवाद साधला.
कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदी यांनी मुंबईबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर पवार म्हणाले की, कर्नाटकमधल्या नागरिकांना बरे वाटावे म्हणून त्यांनी अशा प्रकारचे विधान केले आहे. त्यामुळे त्याकडे आपण दुर्लक्षच करायला हवे.
बेळगाव आणि आसपासच्या मराठी गावांविषयी बोलताना अजित पवार यांनी “ज्या गावांचा वाद आहे, तो मिटेपर्यंत तो भाग केंद्रशासित प्रदेश करण्याबाबत सुचवले आहे. त्याचा मुंबईशी अर्थाअर्थी संबंध नाही. त्या भागात अनेक वर्षे मराठी आमदार, महापौर, नगरसेवक निवडून येत होते. नंतर तिथल्या मतदारसंघांची फेररचना केली. मराठी भाषिकांच्या गावांमध्ये इतर जास्त संख्येची कानडी गावे जोडली गेली आणि त्यातून मराठी आमदारांचे मतदारसंघ फोडले गेले. हा त्यांचाच भाग असल्याचे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. दोन राज्यांबाबतच्या अशा वादामध्ये केंद्राने मध्यस्थी करून मार्ग काढायचा असतो अशी अपेक्षाही त्यांनी सांगितले.
मेट्रो प्रकल्पाबाबत दर महिन्याचा आढावा मुख्यमंत्र्यांसोबत घेतला जातो. या चर्चेत सर्व संबंधित अधिकारी उपस्थित असतात. राज्यात सुरु असलेल्या सर्व मेट्रो प्रकल्पांना निधी कमी पडू देणार नाही असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.
हा राज्याच्या इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रश्न आहे. ज्याचा आम्ही सातत्याने पाठपुरावा करत आहोत. देवेंद्र फडणवीस यांनी काय ट्विट करावे हा त्यांचा प्रश्न आहे. परंतु सर्व मेट्रो प्रकल्पांच्या कामात कोणतीही दिरंगाई होत नाही. या राज्याच्या सर्वांगीण विकासाच्यादृष्टीने हे प्रकल्प फार महत्त्वपूर्ण असतात. आम्ही राज्य मंत्रिमंडळात काम करत असल्याने याची जाणीव आम्हाला आहे. यासाठी आमचे मार्गदर्शक आदरणीय खासदार शरद पवारसाहेब वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करत असतात असेही त्यांनी सांगितले.