Breaking News

मुंबई महापालिकेच्या विभाजनावरून भाजप-काँग्रेस समोरासमोर तर शिवसेनेला उशीराने जाग ; सभागृहाचे कामकाज दोनवेळा तहकूब

नागपूर : प्रतिनिधी

राज्याची राजधानी असलेल्या मुंबईची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने मुंबई महापालिकेचे तीन भागात विभागण करण्याची मागणी काँग्रेसचे आमदार नसीम खान यांनी केली. मात्र भाजपने याचा राजकिय फायदा उठविण्यासाठी मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे पाडण्यासाठी काँग्रेसकडून हा प्रस्ताव आणला जात असल्याचा आरोप आमदार आशिष शेलार यांनी केला. त्यामुळे सत्ताधारी भाजप आणि काँग्रेसचे सदस्य आमने-सामने आल्याने सभागृहाचे कामकाज दोनवेळा तहकूब करावे लागले.

विधानसभेत काँग्रेसचे आमदार नसीम खान यांनी एकच मुंबई महापालिका असलेल्या महापालिकेचे तीन महापालिकेत विभाजन करण्याचा मुद्दा औचित्याच्या मुद्याद्वारे उपस्थित केला. त्यास भाजपच्या आशिष शेलार यांनी हरकत घेत मुंबई महाराष्ट्राला मिळावी याकरिता १०८ हुतात्म्यांनी बलिदान दिले. तसेच आंदोलने झाली. तरीही मुंबईचे तुकडे पाडण्याचा प्रस्ताव काँग्रेसकडून मांडला जात असल्याने हा प्रस्ताव सभागृहाच्या कामकाजातून काढून टाकावा अशी मागणी केली.

त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मुंबई महाराष्ट्रातच रहावी यासाठी आपण सर्वच जण प्रयत्नशील आहोत. मात्र नसीम खान यांनी मुंबई महापालिकेचे तीन भागात विभागणी करण्याची मागणी केली. त्याचा अर्थ मुंबई वेगळी करा किंवा त्याचे तुकडे करा असा होत नसल्याचे सांगत काँग्रेसची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान या सर्व वादावादीत शांत असलेल्या शिवसेनेला राजकिय जागरूकपणा येत शिवसेनेचे देगलूरचे आमदार सुभाष साबणे यांनी मुंबईची विभागणी अशक्य असल्याचे सांगितले.

अखेर अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी याप्रश्नी नसीम खान यांच्या मुद्यावर तुमचेही मते आल्याने ते सर्व रेकॉर्डवर राहील असे स्पष्ट केले. मात्र सत्ताधारी बाकावरील शिवसेना-भाजपच्या सदस्यांनी अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत धाव घेत नसीम खान यांच्या मुद्याच्या विरोधात घोषणा देण्यास सुरुवात केल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. त्यातच अखेर अध्यक्षांनी सभागृहाचे कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब केले. सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरु झाल्यानंतर सत्ताधारी बाकावरील सदस्यांनी अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत एकत्र होत मुंबई प्रश्नावरून सत्ताधारी आणि विरोधीबाकावरील सर्वपक्षिय सदस्य एकमेकांसमोर येत परस्पर विरोधी घोषणाबाजी करू लागले. तरीही अध्यक्षांनी कामकाज पुढे रेटण्याचा प्रयत्न केला. अखेर गोंधळ वाढल्याने सभागृहाचे कामकाज पुन्हा अर्धा तासासाठी तहकूब केले.

 

Check Also

नाना पटोले यांचा सवाल महागाई, बेरोजगारीसारख्या प्रश्नावर भाजपा गप्प का?

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही काँग्रेस नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला. लोकसभेची निवडणूक जनतेने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *