मुंबई: विशेष प्रतिनिधी
लॉकडाऊन काळात राज्यातील वीज ग्राहकांना मीटर रिडींग न घेता आल्याने आणि वीज बील भरण्यास तीन महिन्याची मुदत दिली. मात्र जून महिन्यात वीज बीलांचे आकडे पाहून राज्यातील जनतेमध्ये रोष पसरला. अखेर या वाढीव वीज बीलावर तोडगा काढण्यासाठी ज्यांची वाढीव बीले असतील, त्यांना बिलातील फरकाची रक्कम सबसिडी स्वरूपात दिली जाणार असून टाटा पॉवरकडून वाढीव वीज बिलाची रक्कम आली की याची कारवाई त्वरीत सुरु करण्यात येणार असल्याची माहिती ऊर्जा विभागातील विश्वसनीय सूत्रांनी दिली.
महावितरण, अदानी आणि टाटा पॉवर या तिन्ही कंपन्यांच्या ग्राहकांसाठी देण्यात येणारी सबसिडीची रक्कम १२०० ते १५०० कोटी रूपयांच्या घरात येण्याची शक्यता आहे. सध्या महावितरण आणि अदानीकडून जमा करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार १००० ते १२०० कोटी रूपयांचा खर्च येणे अपेक्षित आहे. टाटाची अंतिम आकडेवारी आल्यानंतर त्यात फारतर आणखी २०० ते ३०० कोटी रूपयांची वाढ होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.
तीन महिन्यात वीज बिले वाढीव स्वरूपाची आल्याची तक्रार अनेकांनी केली. त्यामुळे या वाढीव बीलांमध्ये दुरूस्ती करण्याचे काम सध्या वीज महावितरण कंपनीकडून सुरु आहे. मुंबई महानगरात अदानी वीज कंपनीने यासंदर्भातील तफावतीची रक्कम जवळपास निश्चित केली आहे. तर टाटा पॉवरकडून त्यांच्या ग्राहकांना देण्यात आलेल्या वीज वापरातील तफावतीची रक्कमेची आकडेवारी एकत्रित करण्याचे काम सुरु आहे. याशिवाय टाटाकडून चालू महिन्याचे मीटररि़ंडींगचे काम सुरु आहे. ही सबसिडी देताना मागील वर्षी त्याच महिन्यात असलेले वीज बील किंवा तत्पूर्वी असलेल्या तीन ते चार महिन्यातील सरासरी तपासून ही सबसिडी देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
त्यामुळे जरी वाढीव बीले जुलै महिन्यात जरी ग्राहकांना मिळाली असतील तर ग्राहकांनी ही बिले भरल्यास आगामी काळात येणारी सबसिडीची रक्कम त्यांच्या खात्यावर क्रेडिट होणार आहे. तसेच भविष्यात त्या रकमेतून ती रक्कम वीज बीलात कमी करून उर्वरित रक्कम कपात करण्यात येणार असल्याचेही त्यांनी शेवटी स्पष्ट केले.