मुंबई : प्रतिनिधी
शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या लोअर परळ येथील कमला मिल आवारातील आगीत १४ जणांचा मृत्यू झाला. या सदर आग प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देत याप्रकरणात दोषी असणाऱ्या सर्व संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिका आयुक्तांना दिले.
आज पहाटे मुंबईत घडलेल्या दुर्घटनेत १४ नागरिकांना प्राण गमवावे लागले असून अनेक जण जखमी झाले आहेत. याबाबत तीव्र दु:ख व्यक्त करतानाच मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. या घटनेची माहिती कळताच यासंदर्भात मुंबई महापालिका आयुक्तांकडून घटनेबाबतची माहिती जाणून घेतली आणि तात्काळ कारवाईचे आदेश दिल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या प्रसिध्दी पत्रकातून देण्यात आली आहे.
त्यामुळे अग्निरोधन यंत्रणा बसविण्याच्या कायद्याच्या अंमलबजावणीबाबत चालढकल करणाऱ्या मुंबई महापालिकेचे अधिकारी, अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई होण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.