लखीमपूर खेरी-वृत्तसंस्था: प्रतिनिधी
केंद्राच्या तीन कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांवर केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा आणि उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव मोर्या यांच्या ताब्यातील एका वाहनाने थेट शेतकऱ्यांवरच वाहन चढविले. त्यात दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे येत आहे तर आंदोलनकर्त्ये शेतकऱ्यांनी यात ८ जणांचा मृत्यू आणि अनेक जण जखमी झाल्याचा दावा केला.
केंद्रीय गृहराज्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री केशव मोर्या हे लखीमपूर खेरीहून आपल्या नियोजित कार्यक्रमासाठी जाणार होते. मात्र या रस्त्यावर पूर्वीपासूनच शेतकरी आंदोलन करत होते. यावेळी त्यांच्या ताब्यातील एक गाडीने थेट आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांवर गाडी घातली. त्यात दोघांचा मृत्यू झाला. त्यानंतर संतापलेल्या शेतकऱ्यांनी गाड्यांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. त्यात अनेक गाड्यांचे नुकसान झाले तर एक गाडी पलटी झाली.
शेतकऱ्यांवर गाडी घालणाऱ्यांमध्ये केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचे सुपुत्र होते अशी माहिती पुढे येत असून मिश्रा यांच्या मुलानेच शेतकऱ्यांवर गाडी घातली आणि काही शेतकऱ्यांना चिरडून मारल्याचे सांगण्यात येत आहे.
शेतकऱ्यांना हटविण्यासाठीच या जाणीवपूर्वक रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांवर गाड्या घालण्यात आल्याचे सांगण्यात येत असून गाडी शेतकऱ्यांवर घालण्यामध्ये मंत्र्याचा मुलगा असल्याचे काही जणांनी पाहिल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान या घटनेप्रकरणी गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांनी आपला मुलगा त्या ठिकाणी हजर नव्हता. जर असता तर त्याला शेतकऱ्यांनी ठेचून मारले असते. मात्र शेतकऱ्यांचे आंदोलन ही राजकिय शक्तींच्या हाती गेल्याने या प्रकारच्या घटना घडत आहेत. त्याचबरोबर आमच्या ताफ्यातील गाडीच्या ड्रायव्हरसह चार जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण गायब असल्याचे स्पष्ट केले.
या घटनेचे वृत्त कळताच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या घटनेचा निषेध करत असून आंदोलनकर्त्यां शेतकऱ्यांवर अशा पध्दतीने वाहन घालण्याचा प्रकार वाईट असल्याची टीका केली.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही या घटनेचा निषेध केला. तर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी आणि समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव हे उद्या घटनास्थळी भेट देणार आहेत.