नागपूर : प्रतिनिधी
विरोधकांनी मांडलेल्या प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी भलताच जोष दाखविला. परंतु या जोषात विरोधकांच्या उचकाविण्याला बळी पडत आपल्याच जिल्ह्यातील अर्थात सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्याबरोबर असलेले राजकिय शत्रुत्वावर भाष्य केल्याने विरोधकांची चांगलीच करमणूक झाली.
शेतकऱ्यांना कर्ज वाटप करताना अनेक जिल्ह्यातील जिल्हा सहकारी बँका या कशा तोट्यात आहेत याची माहिती सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली. तसेच या सर्व जिल्हा बँका या राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या अधिपत्याखाली असल्याची माहिती सभागृहात उघडकीस करत अनेक नेत्यांच्या सहकारी साखर कारखाने आणि कंपन्यांकडे कर्जाची थकबाकी असल्याचे जाहीर केले. तसेच कृषी बाजार समिती, विविध सहकारी संस्थांची पोलखोलही केली.
नेमका हाच धागा राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार यांनी पकडत मंत्री देशमुख यांना उचकाविण्यासाठी सोलापूर कृषी बाजार समितीच्या नुकत्याच झालेल्या निवडणूकीत मंत्री सुभाष देशमुख यांचा पराभव झाल्याची माहिती जिल्ह्याचे पालक मंत्री विजय देशमुख यांनी दिल्याचे विधानसभेत सांगितले. त्यावर तात्काळ पालकमंत्री विजय देशमुख यांनी अजित दादांनी फक्त तुम्ही निवडूण आला का? असा दोनवेळा मला इथेच सभागृहात प्रश्न विचारला आणि फक्त मी होकार दिला, त्याशिवाय मी कोणतीही माहिती त्यांना दिली नसल्याचे स्पष्ट केले.
परंतु नेमक्या याच स्पष्टीकरणामुळे मंत्री सुभाष देशमुख हे दुखावले गेले आणि त्यांनी मला आता मुळ कळले असे सांगत आमचे पालक मंत्री कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कळपात शिरल्याचा आरोप पालक मंत्री विजय देशमुखांवर केला. तसेच आमच्या बाजार समित्यांमध्ये ४९ कोटी रूपयांचा आर्थिक घोटाळा झाल्याने संबधित व्यक्तींवर गुन्हे नोंदविले. ते सर्वजण विरोधी पक्षाचे असल्याने त्या सर्वांनी मिळून आमच्या पालक मंत्र्यांना गळाला लावल्याचे सांगितले. तेही त्यांच्या गळाला लागल्याने त्यांचा विजय झाल्याचा उपरोधिक उल्लेख केला. मात्र जरी या निवडणूकीत माझा पराभव झाला असला तरी माझा पराभव झाल्याचे मानत नसल्याचे सांगत पालक मंत्र्यांबरोबर राजकिय कुरघोडीचे राजकारण सुरुच राहणार असल्याचे जाहीर केले.
या दरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे भारत भालके, अजित पवार, पाटील यांनी वारंवार तुम्ही बोला तुम्ही बोला असे सांगत मंत्री सुभाष देशमुख यांना उचकावित होते.
विधानसभेतच या सर्व दोन मंत्र्यांमधील राजकिय कुरघोडीचे राजकारण उघड होत असताना मात्र महसूल मंत्री आणि इतर सहकारी मंत्री व भाजप आमदार गप्पगार बसले होते.