मुंबई: प्रतिनिधी
राज्यातील वाढत्या कोरोनाच्या संसर्गाला रोखण्यासाठी राज्य सरकारकडून दिवसेंदिवस कडक निर्बंध लागू करण्यात येत असल्याने अकृषिक विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या ऑफलाईन परिक्षा घेणे अशक्य झाले. त्यामुळे या सर्व परिक्षा आता ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.
राज्य सरकारने आज आणखी कडक निर्बंध लागू केले असून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या व्यक्तीरिक्त इतर व्यक्तींना घराबाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला आहे. तसेच हे नवे नियम १ मे पर्यंत लागू राहणार असल्याने विद्यार्थ्यांची ऑफलाईन परिक्षा घेणे अशक्य बनले. यापार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
ऑनलाईन परिक्षेपासून एकही विद्यार्थी वंचित राहू नये या साठीचे आदेश राज्यातील सर्व विद्यापीठांना काळजी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे उद्यापासून राज्यातील १३ अकृषी विद्यापीठांमधल्या कोणत्याही वर्षाच्या परीक्षा या ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जाणार आहे. आत्तापर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाईन आणि ऑफलाईन असे पर्याय देण्यात आले होते, विद्यापीठांना त्यासंदर्भात निर्णय घेण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार काही विद्यापीठांनी ऑनलाईन परीक्षा सुरू देखील केल्या होत्या. मात्र, आता सर्व १३ अकृषी विद्यापीठांना ऑनलाईन परीक्षा घेण्याच्या सूचना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रातल्या सर्व १३ अकृषी विद्यापीठांमध्ये उरलेल्या सर्व परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जातील. या परीक्षा घेताना जर विद्यार्थ्यांना काही तांत्रिक अडचणी निर्माण होणार असतील, तर त्याची पूर्तता करण्याच्या सूचना आणि विनंती मी सर्व १३ विद्यापीठांच्या कुलगुरुंना केली आहे. या परीक्षांमधून कोणतेही विद्यार्थी वंचित राहणार नाहीत, याची दक्षता या विद्यापीठांनी घेतली पाहिजे असे आदेशही देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, हा निर्णय उद्यापासूनच लागू करण्यात येईल. सर्व विद्यापीठांमध्ये परीक्षा सुरू आहेत. काही ठिकाणी अपवादात्मक परिस्थितीत ऑफलाईन परीक्षा घेण्यात आल्या आहेत. पण उद्यापासून त्या शक्य नसल्यामुळे सर्वच कुलगुरुंनी सरकारला विनंती केली होती. त्यानुसार आजच्या बैठकीत निर्णय घेण्यात आलेला आहे. कोणत्याही विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीचं शैक्षणिक नुकसान होणार नाही याची काळजी विद्यापीठांनी घ्यायची आहे. या परीक्षांमध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय अशा सर्वच वर्गांच्या परीक्षांचा समावेश राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
उच्च शिक्षण विभागातील कर्मचारी अत्यावश्यक सेवेत गणला जावा, अशी विनंती आम्ही मुख्यमंत्र्यांना करणार आहोत. यामुळं निकाल लवकर लागेल. राज्यातील ३७ लाख कॉलेज विद्यार्थ्यांचे लसीकरण विद्यापीठांमार्फत करण्याचा आमचा मनोदय आहे. १८ ते २५ वयोगटातील हे विद्यार्थी आहेत त्यामुळं त्याचं लसीकरण होणं गरजेचे आहे. प्राध्यापक भरतीबाबत चर्चा लॉच्या विद्यार्थ्यांना नवीन प्रवेशासाठी मुदत वाढवून देणार आहोत. प्राध्यापक भरतीबाबतही चर्चा झालीय. ही भरती करणार आहोत. फक्त कोविड संकट कमी झाल्यावर होईल, प्राध्यापक भरती होणार नाही, अशा चर्चांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन त्यांनी केले.
एनसीसी व एनएसएसच्या प्रमुखांशी बोलणार आहे. हे विद्यार्थी लसीकरण मोहिमेत स्वयंसेवक म्हणून सहभागी होतील. संजय ओक यांनी तसं आवाहन केले होते. त्यांच्याशीही मी बोलणार आहे. रत्नागिरी व सिंधुदूर्ग जिल्ह्यात ऑक्सिजन कमतरता नाही. लस व रेमडेसिव्हीरचं समान वाटप केंद्राने करावे अशी मागणीही त्यांनी यावेळी त्यांनी केली.