नागपूर : प्रतिनिधी
राज्यातील ग्रामीण भागातून शहरी किंवा तालुक्याच्या ठिकाणी दूध आणि दुग्धजन्य पदार्थ पोहचविण्यासाठी शेतकऱ्यांकडून एस.टी बसेसचा वापर केला जात असे. मात्र त्यावर गेल्या महिन्यात एसटी महामंडळाने बंदी घातल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होवू लागल्याने दूध व दुग्धजन्य पदार्थांवर घालण्यात आलेली बंदी उठविण्यात आल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री दिवाकार रावते यांनी विधानसभेत एका निवेदनाद्वारे दिली.
सांगली येथील एस.टी. बसस्थानकावर खवा, बर्फी इत्यादी दुग्धजन्य पदार्थ नाशवंत परिस्थितीत आढळून आले. त्यामुळे या नाशवंत वस्तूंचा परिमाण नागरीकांवर होवून आरोग्यास अपाय होण्याची शक्यता वाढल्याने १५ नोव्हेबर २०१७ रोजी एस.टी.महामंडळाने पत्रक काढून दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या एसटी वाहतूकीवर बंदी घातली. त्याचा परिणाम राज्यातील कानाकोपऱ्यात राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या दूध व्यवसायावर झाला.
अखेर याबाबत दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्षनेते आणि सर्व पक्षिय आमदारांनी भेटून विनंती केल्याने शेतकऱ्यांना व्यक्तीश ५० किलोग्रँम पर्यंतच्या दूध व दुग्धजन्य पदार्थांची वेस्टन करून माल वाहतूक करण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेतल्याचे मंत्री रावते यांनी सांगितले.
विशेष म्हणजे ही बंदी आज रात्रीपासून उठविण्यात आल्याचे त्यांनी जाहीर केले. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आता एसटीने दूध पाठविण्याचा मार्ग मोकळा झाला.