मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून दूध उत्पादकांसाठी राज्य शासन नवीन योजना घेऊन येणार असल्याचे पशुसंवर्धन दूग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी सांगितले.दूध दरप्रश्नी चर्चा करण्यासाठी दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनिल केदार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी ते बोलत होते.
या बैठकीस पशुसंवर्धन ,दूग्ध व्यवसाय विकास राज्यमंत्री दत्तात्रय भारणे , माजी विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे,माजी मंत्री सदाभाऊ खोत, माजी खासदार राजू शेट्टी, पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार, वरिष्ठ अधिकारी, शेतकरी संघटनेचे प्रमुख, तसेच राज्यभरातील विविध दूध संघांचे अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक, बैठकीला व्हिडिओ काँन्फरन्स व्दारे सहभागी झाले होते.
मंत्री सुनिल केदार यांनी आज राज्यातील विविध सरकारी आणि खाजगी दूध संघांच्या पदाधिका-यांनी आणि दूध उत्पादक शेतक-यांच्या प्रतिनिधींनी मांडलेल्या समस्या जाणून घेतल्या. शासन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मदतीसाठी गंभीर असून दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी लवकरच नवीन योजना आणण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा करून मंत्रिमंडळ बैठकीत मंजूरी मिळवण्यासाठी जी प्रक्रिया पुर्ण करावी लागते ती जलद गतीने करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पशुसंवर्धन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कोरोनाच्या या संकटप्रसंगी शेतकऱ्यांना मदत करणे गरजेचे आहे. राज्य शासन त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करणार आहे. सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांना दूध संघानेही कठीण परिस्थितीमध्ये जे शक्य असेल ती मदत व आपापल्या परीने सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार यांनी केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती देऊन या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी दूध संघांना केले.