मुंबई : विशेष प्रतिनिधी
मागील अनेक महिन्यांपासून लॉकडाऊन आणि त्यानंतरच्या काळात अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपली मोक्याच्या जागी वर्णी लागावी यासाठी लक्ष्मी नामकच्या सहाय्याने इच्छितस्थळी जागा पटकाविल्याची चर्चा म्हाडा परिसरात सुरु असून त्या आधारे म्हाडाचे तब्बल ४० अधिकारी ईडीच्या रडारवर असल्याची माहिती पुढे येत आहे.
मंध्यतरीच्या काळात अनेक अधिकाऱ्यांनी आपल्या स्पेशल नेटवर्कींगच्या सहाय्याने लक्ष्मी नामकच्या सहाय्याने वरिष्ठांच्या संपर्कात जाणीवपूर्वक केले. त्यावेळी या लक्ष्मी नामकचे भाव चांगलेच वधारले होते. अखेर त्याच्या मागणीनुसार अनेकांनी मागणीची पूर्तता करत आपल्याला हव्या त्या ठिकाणी वर्णी लावून घेतली. दरम्यानच्या काळात भाजपाच्या एका नेत्याने यासंदर्भात माहिती ईडी कार्यालयाला पुरविली असून त्यासंदर्भात ईडीकडून अतिशय गुप्तपणे तपास सुरु असून त्याचे धागेदोरे कुठपर्यत पोहचतात याचा शोध घेतला जात असल्याचे म्हाडातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
लक्ष्मी नामकच्या सहाय्याने आपली वर्णी लावून घेतलेल्या ४० अधिकाऱ्यांची यादी तयार करण्यात आली असून त्यांची सध्या माहिती गोळा करण्याचे काम सुरु आहे. त्याचबरोबर त्या त्या टेबलला किती वरकढ मिळतात याचीही खातरजमा करण्यात येत आहे. त्यामुळे यातील अनेक जण फोनवर बोलण्याऐवजी प्रत्यक्ष भेटून बोलण्यावरच भर देत असल्याचे त्यांनी सांगितले.
मागील अनेक वर्षापासून बदल्यांच्या आणि इच्छितस्थळी पोहोचण्यासाठी नेहमीच लक्ष्मी नामकची मदत घेतली जात आहे. यासंदर्भात काहीजणांनी म्हाडाच्या दक्षता विभागाकडेही तक्रारी केल्या होत्या. मात्र त्यावर काहीच कारवाई झाली नसल्याने या गोष्टीचा पर्दाफाश करण्यासाठी म्हाडातील काही जबाबदार अधिकाऱ्यांनी भाजपामधील नेत्यांची मदत घेतल्याचेही त्यांनी सांगितले.
या भाजपातील नेत्यांच्या मागणीनुसार काही कागदपत्रे, काही जणांचे फोन कॉल्स रेकॉर्ड आणि बदल्या झालेल्यांची यादी ईडीकडे पोहोचविण्यात आली आहे. त्यानुसार ईडीकडून पुढील कारवाई सुरु असून योग्य वेळी होत असल्याचे सर्वांनाच पाह्यला मिळेल असेही ते म्हणाले.
यासंदर्भात मंत्रालयातील गृहनिर्माण विभागात चौकशी केली असता ईडीकडून अद्याप गृहनिर्माण विभागाला कोणतीही विचारणा करण्यात आली नसल्याने त्याबाबत बोलणे योग्य होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.