मुंबई : प्रतिनिधी
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस व उत्तर प्रदेशच्या प्रभारी प्रियंका गांधी या पीडित शेतकरी कुटुंबियांना भेटण्यास जाताना उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना केलेल्या अटकेचा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी तीव्र निषेध केला आहे. उत्तर प्रदेशात कायद्याचे राज्य नसून अजयसिंह बिष्ट यांच्या नेतृत्वाखालील तालीबानी राज असल्याचा घणाघाती आरोप नाना पटोले यांनी केला.
मोदी सरकारमधील गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाच्या कारने शेतक-यांना चिरडले. मंत्र्यांच्या मुलावर कारवाई करण्याऐवजी त्याला वाचवण्यासाठी अजयसिंह बिष्ट यांचे सरकार आटापिटा करत आहे. तर पीडित शेतकरी कुटुंबियांना भेटून त्यांचे अश्रू पुसण्यासाठी जात असताना काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी, खासदार दिपेंदर हुड्डा व काँग्रेस कार्यकर्ते यांच्याशी पोलिसांनी गैरवर्तन केले तसेच त्यांना बेकायदेशीर अटक केली. उत्तर प्रदेशात लोकशाहीचा गळा घोटला जात असून शेतकरी, दलित, वंचित, अल्पसंख्यांक समाजावर अन्याय व अत्याचार केले जात आहेत, पिडीत कुटुंबियांना भेटू दिले जात नसल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
प्रियंका गांधी यांना लखीमपूर खेरीला जात असताना रस्त्यावर अनेक ठिकाणी अडवण्यात आले. प्रियंका गांधी यांना भारतीय जनता पक्ष व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री का घाबरतात? पीडित कुटुंबियांना भेटणे भाजपाच्या राज्यात गुन्हा आहे का ? उत्तर प्रदेशातील भाजपाच्या अत्याचारी राजवटीला तेथील जनता कंटाळली आहे. या अत्याचारी सरकारला जनता धडा शिकवेल. काँग्रेस पक्ष जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभा असून प्रियंकाजी गांधी यांना पीडित कुटुंबियांना भेटण्यापासून कोणीही रोखू शकत नाही, असेही ते म्हणाले.
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील शेतकरी नरसंहाराच्या निषेधार्थ व शेतक-यांचे मारेकरी भाजप सरकारच्या विरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी राज्यभर आज आंदोलन करणार आहे. मुंबईत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली आज मंत्रालयाजवळील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आले.
Tags congress farmers protest meet with victimized people is ban in uttar pradesh? nana patole questioned on up police bared priyanka gandhi. nana patole priyanka gandhi
Check Also
वंचितकडून चुकीच्या पाणीपट्टी देयकांची होळी
वाईट शक्तींना जाळून होळीचा सण साजरा करण्याची परंपरा आहे. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अशाच चुकीच्या …