मुंबई : प्रतिनिधी
केंद्रातील भाजपा सरकारने वीज बचत व्हावी व पर्यावरण पुरक म्हणून मुंबईत एलईडी दिवे लावण्यास सुरुवात केली, तेव्हा क्विन नेकलेसची शोभा जाईल अशी ओरड करण्यात आली होती. हे जे ओरडत होते त्यांनी क्विन नेकलेसच आता तोडला त्याचे काय? असा सवाल करीत हा दुटप्पीपणा, ढोंगीपणा असल्याचा आरोप भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी केला.
आमदार अँड आशिष शेलार यांनी ट्विट मध्ये म्हटले आहे की, केंद्र सरकारच्या पुढाकाराने पर्यावरण पुरक एलईडी दिवे मुंबईत लावले गेले तेव्हा काही जणांनी मरिन ड्राईव्ह, क्विन नेकलेसची शोभा जाईल म्हणून केवढा थयथयाट केला. अखेर झाले काय? तर शोभा वाढलीच! पण..आता क्विन नेकलेसची माळ हे तोडूच टाकत आहेत, क्विन नेकलेसच राहणार नाही त्याचे काय? आता पारसी गेट तोडलाच…समुद्रात अधिकचा भराव टाकून ती जागा पण खाणार…परिसराची शोभा घालवणार. आता हे तुम्ही करताय ते पुण्य? आम्ही पर्यावरण पुरक दिवे लावले ते पाप? झाला ना तुमचा दुटप्पीपणा, मुंबईचे बेगडी प्रेम उघड? मरिन ड्राईव्हच्या किनाऱ्याला तुमच्या “ढोंगीपणाचा गाळ” दिसला ना अशा सूचक शब्दांत त्यांनी टीका केली.