मुंबई: प्रतिनिधी
यापूर्वीच्या आघाडी सरकारच्या काळातील मराठा आरक्षण कायद्यातंर्गत निवड होऊनही केवळ न्यायालयीन स्थगिती मुळे संधी हिरवलेल्या उमेदवारांना यावर्षी पुन्हा संधी उपलब्ध होणार आहे. त्यावेळी ऊर्जा विभागाने केलेल्या भरती प्रक्रियेत एसईबीसी प्रवर्गातून काही तरूणांची निवड केली. मात्र स्थगितीच्या आदेशामुळे त्या उमेदवारांना संधी मिळावी नव्हती. अखेर त्या उमेदवारांना पुन्हा आता नव्याने लागू केलेल्या एसईबीसी आरक्षणात संधी मिळणार असल्याची माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आज दिली.
सन २०१४ मध्ये मराठा आरक्षणांतर्गत ऊर्जा विभागात निवड करण्यात आली होती. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने या आरक्षणाला स्थगिती दिल्यांनतर त्या उमेदवारांना संधी मिळू शकली नव्हती. अशा अनेक उमेदवारांनाही आपल्याकडे पत्र व्यवहार, ई-मेल द्वारे संपर्क साधला होता. यासंदर्भात त्या उमेदवारांना पुन्हा नव्याने लागू केलेल्या आरक्षणात संधी द्यावी अशी मागणी मंत्रिमंडळाच्या बैठकीत केली. त्यावर तात्काळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगेच मान्यता दिल्याचे त्यांनी सांगितले.
ऊर्जा विभागात नाकारली गेलेली संधी मिळावी यासाठी सकाळ मराठा क्रांती ठोक मोर्चाचे नितीन बच्छाव आणि मयूर जाधव यांनी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याकडे यासंदर्भात पत्रव्यव्हर केला होता.